• सलग तिसऱ्या दिवशी कोसळधार सुरूच
• बोर्लीपंचतनला जोडणारे मार्ग पाण्याखाली; परिसरात शाळांना सुट्टी
• रस्त्यावर पाणी आल्याने दिवसभर वाहने अडकली
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यात मंगळवार पासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले. बोर्लीपंचतन-म्हसळा तसेच श्रीवर्धन – बोर्लीपंचतनकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर पाणी वाढल्याने गुरुवारी दिवसभर वाहने अडकून पडली होती. तर या अतिवृष्टीमुळे स्थानिक शाळा व्यवस्थापनाने बोर्लीपंचतन परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर केली.
श्रीवर्धनमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत मागील दिवसात तुरळक पावसामुळे सर्वात कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याची नोंद झाली. त्यामुळे येथील जनजीवन व वाहतूक सेवा सुरळीत सुरू होती. मात्र, यावेळी मंगळवार पासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले. तीन दिवस अतिवृष्टीने श्रीवर्धन मधील शिस्ते, कापोली, खुजारे, आरावी या गावांच्या नद्यांनी पातळी इशारा ओलांडल्याने अनेक मुख्य रस्त्यावर पाणी आले व या गावांना नद्यांनी पूराचा वेढा दिला. दिवसभरात कोठे मोठे नुकसान झाल्याची नोंद नव्हती. मात्र, या पावसात सर्वत्र पाणी तुंबण्याची अवस्था पाहायला मिळाली.
श्रीवर्धनमध्ये मागील गुरुवारी ५५ मिलिमीटर सर्वात कमी पावसाची नोंद झाली होती. काल बुधवारी १६६ मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत १९५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने तालुक्यात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पाणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यातील सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. समुद्र देखील खवळला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरील पाणी ओसरले नसून अद्याप पूरसदृश्य परिस्थिती तशीच आहे.