फळझाड, भाजीपाला लागवड करण्यास शेतकरी सज्ज
वैभव कळस
म्हसळा : जिल्ह्यातील म्हसळा तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ लोकवस्तीचा असला तरी सर्व संपन्न आहे. तालुक्याचे पश्चिम व उत्तर भागात समुद्र खाडी तर दक्षिण भागात लागुनच सावित्री नदी वाहत आहे. उंच सखल भागात वास्तव्यास असणाऱ्या लोकवस्तीमधील शेतकरी आंबा, काजू आदी फळबागा बरोबरच भातशेती आणि नाचणी, वरीची पिक घेतात तर समुद्रखाडी किनारी भागात वास्तव्यास असणाऱ्या लोकवस्तीमधील शेतकरी प्रामुख्याने मासळी व्यवसाय करतात. सावित्री नदी पात्राचे व खाडी किनारी वास्तव्यास असणाऱ्या लोकवस्तीमधील शेतकरी जोड व्यवसाय म्हणुन काही प्रमाणात रेती उत्खनन करतात तर बहुतांश नागरीक देश, विदेशात चाकरमानी व लघुउद्योग करीत असल्याने म्हसळा तालुका तसा आर्थिकदृष्टया सुजलाम सुफलाम असल्याचे निदर्शनास येत आहे.
या वर्षी पावसाला उशिरा म्हणजे जुन अखेर सुरुवात झाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील हंगामी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी भात, नागली आणि थोड्या प्रमाणात वरिची उशिरा पेरणी केल्याने रोपांची वाढही चांगली होऊन त्यांची लावणी, आवटणी वेळीच झाली आहे. माहे जुलै महिन्यात म्हसळा तालुक्यात संततधार पावसाने शेतीची कामे पूर्णत्वास गेली असल्याने बळीराजा सुखावलेला दिसत आहे. उंच सखल भागातील म्हसळा तालुक्यात कीतीही मुसळधार पाऊस कोसळला तरी पावसाचे सर्व पाणी समुद्र खाडीत जात असल्याने पुर येणे किंवा शेती वाहुन जाण्याचा विशेष धोका नसल्याचे निदर्शनास येते. पावसाचे पाण्याने पूर न येणे हा तसा एक प्रकारे म्हसळा तालुक्यासाठी नैसर्गिक वरदान लाभला आहे. म्हसळा तालुक्यात भात पिकाचे एकुण क्षेत्र २२६० हेक्टर इतके आहे. या वर्षी अवघ्या १९०.५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे पैकी १२०.५० हेक्टर क्षेत्रावरील लावणी पुर्ण झाली आहे. दोन चार दिवसात भात पिकाची लावणी पुर्ण होईल अशी माहिती कृषी पर्यवेक्षक सुजय कुसाळकर यांनी माहिती देताना सांगितले.
तालुक्यातील पीक पाणी बाबत अधिक पणे माहिती देताना तालुक्यात नाचणी पिक क्षेत्र ३१६ हेक्टर इतके आसुन केवळ २६.६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे पैकी २० हेक्टर क्षेत्रावरील लावणी अर्थात आवटनी पुर्ण झाली आहे. तालुका कृषी विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ५३.१६ हेक्टर क्षेत्रावर आंबा, काजू लागवड करण्यासाठी १०० शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत १२.२७ हेक्टर क्षेत्रावर प्रामुख्याने मेंदडी, मेंदडीकोंड, पेडांबे, तोराडी, काळसुरी, कोकबल, घुम, रुद्रवट, घोणसे, खारगाव बुद्रुक, खामगाव, सोनघर या गावांमध्ये आंबा काजू लागवड करण्यात येत आहे. परसबागेत भाजी लागवड करण्यासाठी तालुका कृषी विभागामार्फत मिनीकीट प्राप्त झाले आसुन ते आगरवाडा, पेडांबे, वरवठणे , रेवळी, बनोटी, गणेशनगर, बंडवाडी, तोराडी, पाणवे, केलटे, खरसई, मेंदडी, मेंदडीकोंड, वारल, काळसुरी, रोहिणी, आडीठाकूर, चिखलप, सकलप, खारगाव बु., सुरई, पाभरे, खामगाव, सोनघर, पाष्टी, मांदाटणे आदी गावांत वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ३४०० मि.मी. इतके आहे. आतापर्यंत महिनाभरात म्हसळा तालुक्यात २०५८ मी.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसात म्हसळा तालुक्यात शेतीची कामे वेळीच पुर्ण होत असल्याने बळी राजा मात्र सुखावला आहे.