भिसे गावातील घटना,बालिकेच्या सतर्कतेने अनर्थ टळला
अमोल पेणकर
रोहे : शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी अशी घटना मंगळवार दि. 25 जुलै रोजी घडली आहे. आम्ही शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आपल्या घरातील पाण्याच्या टाक्या बसवण्यासाठी आलो असल्याचे सांगत भिसे येथील एका घरात पाच इसम शिरले होते. याच वेळी त्यांची नात बाहेरून आली असता आपल्या घराला आतून कडी असल्याचे लक्षात येताच तिने आरडाओरडा केला असता ते इसम पळून गेले. यामुळे चोरी अथवा अन्य मोठा अनर्थ होण्याची घटना टळली आहे. या घटनेची माहिती रोहे पोलिसांत पोलीस पाटील संतोष जाधव यांनी तात्काळ दिली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. किशोर देशमुख व पोलिस निरिक्षक प्रमोद बाबर यांनी केले आहे. या घटनेवरुन मेढा, निडी फाटा, आमडोशी फाटा या भागात सीसीटीव्ही यंत्रणा ही अत्यंत गरजेची असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. रिलायन्स, सुप्रीम या कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधी सार्वजनिक सुरक्षिततेसाठी खर्च करावा असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, रोहा तालुक्यातील भिसे येथे मंगळवार, दि. 25 जुलै रोजी विलास कालेकर व त्यांच्या पत्नी आपल्या व्यवसायानिमित्त आठवडे बाजारासाठी बाहेरगावी गेले असता संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांच्या घरी ५ अनोळखी इसम आले. त्यावेळी त्यांचे वयोवृद्ध आई वडील हे दोघेच घरामध्ये होते. त्या आलेल्या इसमांनी आपण शासन आपल्या दारी अंतर्गत आपल्या घरातील पाण्याच्या टाक्या बसवायला आलो असल्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवत त्या वृद्ध दांपत्याने त्यांना घरात घेतले. जसे हे सर्व घराच्या आतील भागात आले याचा फायदा घेत त्या इसमांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. याच वेळी कालेकर यांची मुलगी घराकडे आली असता आपल्या घराला आतून कडी लावली असल्याचे लक्षात आले. आजी आजोबांना आवाज देऊनही दरवाजा उघडला जात नसल्यामुळे तिने आरडाओरडा करत दरवाज्यावर लाथा मारण्यास सुरुवात केली. यावेळी त्या इसमांनी दरवाजा उघडून ते पळून जाण्यात यशस्वी झाले. ही वार्ता गावचे पोलीस पाटील संतोष जाधव यांना समजताच त्यांनी रोहे पोलिसांत या घटनेची माहिती दिली. सुदैवाने या घटनेत चोरी अथवा अन्य कोणतीही घटना घडली नसली तरी नागरिकांनी आपल्या गावात वा घराच्या परिसरात असे कोणीही अनोळखी इसम आढळल्यास सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी कोणत्याही अनोळखी इसमाना आपल्या घरामध्ये प्रवेश देवु नये.असे कोणीही संशयास्पद आढळल्यास पोलिस पाटील अथवा बिट अमलदार यांना त्वरीत कळवावे.घटनेचे गांभीर्य लक्षात बिट स्तरावर गस्त वाढवण्यात येणार आहे.
– प्रमोद बाबर
पोलिस निरिक्षक
शासनाकडून असे कोणीही व्यक्ती आल्यास नागरिकांनी त्याचे ओळखपत्र प्रथम तपासावे. यासोबतच अश्या कामांसाठी स्थानिक पोलिस पाटील, कोतवाल, तलाठी हे सोबत आहेत का ते पहावे. ते नसल्यास त्याबाबत विचारणा करत खातरजमा करावी.
– डॉ. किशोर देशमुख
तहसीलदार