• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिबंधात्मक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा; नागरिकांची मागणी

ByEditor

Jul 27, 2023

किरण लाड
नागोठणे :
आपल्या देशात सर्प, विंचू, श्वान दंशाच्या दरवर्षी दोन लाख घटना घडत असतात. त्यात अनेक व्यक्ती दगावत असतात. व्यक्ती दगावण्याला जरी अनेक कारणे असली तरी त्यातील प्रमुख कारण म्हणजे सर्प, विंचू, श्वान यांनी दंश केल्यावर त्या व्यक्तीला वेळेतच प्रतिबंधात्मक लस दयावी लागते. ही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसणे. या प्रतिबंधात्मक लस तसेच विविध आजारावरील औषधांचा पुरेसा साठा नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध ठेवावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

नागोठणे विभागात नागोठणे शहर, चिकणी, पाटणसई, वाकण, गोडसई, वजरोली, कानसई, ऐनघर, हेदवली, तामसोली, सुकेळी, मांडवशेत, जिंदाल कंपनी, बाळसई, वांगणी, आमडोशी, कालकाई, चेराठी, वेलशेत, आंबेघर, वणी, कडसुरे, कुहिरे गावाचा काही भाग, मुरावाडी, कोंडगाव, निडी, बाहेरशिव, वाघली, पळस,शेतपळस, कोलेटीचा काही भाग, या सर्व गावांमध्ये येणाऱ्या आदिवासी, ठाकूर, धनगर समाजाच्या वाड्या, तसेच मेढा विभागातील काही गावे येतात. ग्रामिण भागातील, खेड्यापाड्यांतील लोक विविध, साथींच्या आजारावर उपचारांसाठी नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतात. तसेच मुंबई गोवा महामार्गालगत हे प्राथमिक केंद्र असल्याने महामार्गावरील अपघाताच्या दृष्टीने अपघातग्रस्तांना उपचारासाठी महत्वाचे केंद्र आहे.

उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात विविध जातीचे साप बिळाच्या बाहेर येत असतात. अन्नाच्या शोधात भटकत असलेल्या सापावर जर व्यक्तीचा पाय पडला तर सर्प दंश होण्याची शक्यता असते, तसेच विंचू, भटकी कुत्री यांच्यापासूनही नागरिकांना इजा, दंश होण्याची शक्यता असते. सध्या विभागात शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु असून शेतात काम करताना सर्पदंश होण्याच्या घटना ह्या सातत्याने घडत असतात. अशाच वेळी जर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राण्यांच्या दंशावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसेल तर पुढील उपचारासाठी रुग्णाला अलिबाग जिल्हा रुग्णालयात न्यावे लागते, नाहीतर खाजगी हाॅस्पिटलमध्ये न्यावे लागते. पण गरीब रुग्णाला खाजगी उपचार परवडत नाही. अशावेळी लसीविना उपचाराला उशीर झाला तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशीच घटना काल पेण येथील जीते गावात घडली होती. सारा ठाकूर या 12 वर्षाच्या मुलीला मण्यार जातीच्या सापाने दंश केल्याने योग्य उपचार न मिळाल्याने आपला प्राण गमवावा लागला होता.

नागोठणे विभागातील बहुतांश लोक विविध आजारावर उपचारांसाठी नागोठणे येथील सरकारी दवाखान्यात येत असतात. येथील विभागातील लोकसंख्या बघता विविध आजारावरील उपचारांसाठी उपलब्ध औषधांचा तसेच प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा हाॅस्पिटलमध्ये वेळोवेळी भासत असतो. दर महिन्याला येणारा औषधाचा तसेच प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा मुबलक व्हावा जेणेकरुन रुग्णांना आयत्यावेळी धावाधाव करावी लागू नये, अशी सार्थ मागणी नागोठणे विभागातील जनतेने सबंधित प्राथमिक आरोग्य यंत्रणेकडे केली आहे.

नागोठणे विभागात अनेक गाव, तसेच डोंगर कपाऱ्यातील वाड्या येतात. त्यामुळे विभागातील लोकसंख्या मोठी आहे. येथील लोकसंख्येला विविध आजारांवर तसेच प्राण्यांनी दंश केल्यावर उपचारांसाठी नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागते. विशेषतः उन्हाळ्यात व पावसाळ्यात विविध विषारी जातीचे सर्प बिळातुन बाहेर पडतात. अशाच वेळी मनुष्याचा पाय त्यांच्यावर पडला तर सर्प दंशाची शक्यता असते. विंचू, भटकी श्वान यांच्यापासूनही लोकांना दंशाचा धोका असतो. दंश झाल्यावर रुग्णाला वेळीच प्रतिबंधात्मक लस द्यावी लागते. नाहीतर रुग्ण दगावण्याची शक्यता असते. सद्यस्थितीत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅबीजच्या म्हणजेच श्वान दंशाच्या 15 लस, सर्प दंशाच्या (Anti Snake Venom) 140 लसी आहेत. तसेच विंचू दंशाच्या (Scorpion anti Venom)च्या 40 लसी उपलब्ध आहेत. परंतु धनुर्वातावरील लसी सध्या संपलेल्या आहेत. नागोठणे शहर तसेच ग्रामिण भागातील लोकसंख्या बघता व रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला जास्तीत जास्त औषधांचा व लसीचा पुरवठा करण्याची मागणी सबंधित रायगड जिल्हा आरोग्य विभागाकडे करणार आहे.

-डाॅ. आदित्य शिरसाट,
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!