विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन कोलाड बाजुकडून रोहा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याला सुरुवातीलाच मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे तीन ते चार दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झाले. सुदैवाने सर्वजण थोडक्यात बचावले, परंतु कोणाचा नाहक बळी गेल्यानंतर हा खड्डा भरला जाईल काय? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त केली जात असल्याची बातमी ‘रायगड जनोदय’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर याच दिवशी या बातमीची दखल घेत हा खड्डा संबंधितांकडून भरण्यात आला असुन प्रवाशी तसेच रहिवाशी नागरिक यांनी ‘रायगड जनोदय’चे आभार मानले.

कोलाड बाजुकडून रोहा बाजुकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच काही दिवसापूर्वी प्रचंड मोठया प्रमाणात असणाऱ्या रहदारीमुळे मोठा खड्डा पडला होता. यामुळे वाहन चालविताना वाहन चालकांना खबरदारी घ्यावी लागत होती. शिवाय कोलाड बाजारपेठेत चौपदरीकरणाच्या उड्डाण पुलाचे काम सुरु असल्यामुळे महाडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक याच बाजूच्या रस्त्यावरून सुरु आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन खांब, माणगाव व सुतारवाडी या तिन्हीही बाजुकडून रोहा बाजूकडे जाणारी वाहने याच मार्गावरून जात असतात. येथे कोलाड वाहतूक पोलिस व ट्रॅफिक वॉर्डन वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उभे असतात. परंतु या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे खड्डा चुकविण्याच्या नादात घाईगडबडीने वळसा घालतांना काही वेळा ही वाहने वाहतूक पोलिस व ट्रॅफिक वॉर्डन यांच्या अंगावरही जात असल्याचे दिसून येत होते. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याच्या अगोदर संबंधितांनी लक्ष देऊन हा खड्डा भरण्यात यावा अशी बातमी ‘रायगड जनोदय’मधून प्रकाशित होताच हा खड्डा त्वरित भरला गेल्याने नागरिकांनी ‘रायगड जनोदय’चे आभार मानले.
