रत्नागिरी : राज्यात पुन्हा एकदा फोडोफोडीचं राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दावोस दौऱ्यावरून नुकत्याच परतलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला. रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचा मुहूर्तही त्यांनी सांगितला. शिवसेनेत अनेक नेत्यांचा प्रवेश होणार असून त्याची सुरुवात रत्नागिरीतील माजी आमदारांपासून होईल असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. त्यामुळे राजन साळवी यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे.
रत्नागिरीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शुक्रवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यांच्यासोबत अजून चार आमदारही सेनेत येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सोबतच काँग्रेसचे पाच आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन खासदारही शिवसेनेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेत अनेकजण पक्षप्रवेश करणार असून त्याची सुरुवात शुक्रवारी रत्नागिरीमधून होत आहे. रत्नागिरीतील माजी आमदार उद्या प्रवेश करणार आहेत. तसेच राज्यातले 10 माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यातील काहीजण हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. या दोन ते तीन महिन्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाचे अनेक नेते एकनाथ शिंदेचं नेत्रुत्व स्वीकारतील. याची सुरुवात ही माजी आमदारांपासून होणार आहे.
उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यानुसार, राजन साळवी हे शुक्रवारी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही लोकांच्या फडणवीसांकडे वाऱ्या सुरु झाल्या ते आपण पाहिलं. तू राहशील किंवा मी राहीन असं म्हणणारे आज फडणवीसांच्या जवळ जात आहेत. त्यांना देखील समजलं आहे की महायुती शिवाय पर्याय नाही असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.