मिलिंद माने
मुंबई : राज्यात पूर्ण बहुमताने महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सात जागांवर नियुक्त्या झाल्या असल्या तरी उर्वरित पाच जागांसाठी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर चढाओढ चालू असून भाजपात प्रवेश केलेल्या दिगज्यांपैकी मागच्या दाराने विधान परिषदेत जाण्यासाठी तब्बल ६० जण इच्छुक असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त होत आहे
राज्यात दोन महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका होऊन पूर्ण बहुमताने भाजपा सरकार सत्तेत सामील झाले यामध्ये शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी देखील सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर महिन्याभरातच राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सात जागांवर भाजपा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या आमदारांची वर्णी लागली.
राज्यात पूर्ण बहुमताने भाजपा सरकार सत्तेत असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षातून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग चालू असून हे इनकमिंग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे त्यातच भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या दिग्गज पदाधिकाऱ्यांना मागील दाराने विधान परिषदेत जाण्याचे वेध लागले आहेत.
राज्य विधिमंडळातील विधान परिषदेतील संख्याबळ
महाविकास आघाडी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ७
राष्ट्रीय काँग्रेस व एक अपक्षांची साथ ८
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ५
एकूण २०
महायुती पक्षीय बलाबल
भाजपा २३
शिवसेना शिंदे गट ०७
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ०६
अपक्ष ०२
एकूण ३८
राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या ७८असून एकूण रिक्त जागा २० असून त्यातील १५ जागा या स्थानिक प्राधिकरणांमधून निवडून द्यायचे आहेत मात्र मागील पाच वर्षापासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुका न झाल्यामुळे मागील अडीच वर्षापासून स्थानिक प्राधिकरणांमधून रिक्त झालेल्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत. तर पाच जागा राज्यपाल नियुक्त भाजपाच्या कोट्यातल्या शिल्लक आहेत राज्य विधिमंडळाच्या विधान परिषद सभागृहात ७८ सदस्यांचे सभागृह असून त्यापैकी वीस जागा रिक्त असून 58 सदस्य सभागृहात आहेत त्यापैकी एक विधान परिषद सभापती, एक विधान परिषद उपसभापती व एक विरोधी पक्ष नेता.
राज्यात भाजपा बहुमताने सरकार मध्ये असतानाही देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रभुत्व गाजवण्यासाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून यायच्या १५ जागांसाठी देखील भाजपाने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असल्याने त्याचाच एक भाग म्हणून भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. मात्र पक्षात येणाऱ्या व मागच्या दाराने विधान परिषदेत जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या ६० झाली. असून राज्यपाल नियुक्त केवळ भाजपाच्या कोट्यामध्ये पाच जागा असल्याने यामध्ये कोणाची वर्णी लागणार व कोणाला महामंडळावर समाधान मानावे लागणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.