कुटुंबाला मिळणार नुकसान भरपाई, नोकरीची हमी; गोरख ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश
लवकरच उरणच्या पूर्व विभागात सुरु होणार एनएमएमटीची सेवा
विठ्ठल ममताबादे
उरण : खोपटे गावात ८ फेब्रुवारी २०२४ रोजी घडलेल्या एनएमएमटी अपघातातील मृत निलेश शशिकांत म्हात्रे यांच्या कुटूंबियांना सुमारे वर्षभराच्या अथक लढाईतून न्याय मिळाला आहे. हा न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या निलेशच्या भावाला अनेक ठिकणावरून फारसा प्रतिसाद मिळू शकला नव्हता. मात्र म्हात्रे कुटूंबियांनी आपली जिद्द न सोडता युवा कार्यकर्ते गोरख रामदास ठाकूर आणि इतरांच्या माध्यमातून गेले वर्षभर प्रयत्नांची पराकाष्टा केली. अखेर माजी केंद्रीय मंत्री आणि आगरी समाजाचे नेते कपिल पाटील आणि मंत्री गणेश नाईक यांच्या मध्यस्थीने शशिकांत म्हात्रे कुटूंबियांना योग्य त्या भरपाईचा विषय सामंजस्याने सोडविण्यात आला आहे. त्याच बरोबर कुटूंबातील एका सदस्याला फेब्रुवारी महिन्यात नोकरीवर घेण्याचे देखील यानिमित्ताने ठरविण्यात आले आहे. या कामी खोपटे गावातील युवा कार्यकर्ते गोरख रामदास ठाकूर यांचा पुढाकार सर्वस्वी कामी आला आहे. एनएमएमटीचे वरिष्ठ अधिकारी योगेश कडूसकर ह्यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य या कामी लाभले असल्याची माहिती म्हात्रे कुटूंबियांनी दिली आहे.

उरणच्या पुर्व भागातील खोपटे गावात गेल्या वर्षी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी एनएमएमटी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने एनएमएमटी बस थेट रस्ता सोडून खाली उतरत समोरून येणाऱ्या निलेश म्हात्रे याच्या अंगावरून गेल्याने निलेश याचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी ही झाले होते. त्यावेळी संतप्त जमावाने सुमारे अर्धा दिवस रास्ता रोको आंदोलन केले होते. मृत आणि जखमींना न्याय मिळावा अशी संतप्त नागरिकांनी जोरदार मागणी केली होती. त्यावेळी एनएमएमटीच्या अधिकारी वर्गाने आर्थिक स्वरूपात मदत देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन पाळण्यात अधिकारी वर्गाकडून चालढकल केली जात होती. गेल्या वर्षभरात अनेक प्रकारे निलेश म्हात्रे यांच्या कुटूंबियांनी एनएमएमटीच्या अधिकारी वर्गाला विनंत्या केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. मात्र त्यानंतरही म्हात्रे कुटूंबियांनी प्रयत्न करण्याचे सोडून दिले नव्हते. याच प्रयत्नांना गोरख रामदास ठाकूर या तरूणाने सुरूवातीपासूनच हातभार लावत पाठपुरावा सुरू ठेवला होता. या प्रयत्नांमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि आगरी समाजाचे नेते कपिल पाटील आणि मंत्री गणेश नाईक यांची साथ लाभल्याने टाळाटाळ करणाऱ्या एनएमएमटीच्या अधिकारी वर्गाने अखेर हा विषय मार्गी लावत निलेश म्हात्रे यांच्या कुटूंबियांचा भरपाईचा विषय सामंजस्याने सोडविला आहे. त्याचबरोबर येत्या फेब्रुवारी महिन्याच्या १ तारखेपासून निलेश म्हात्रे यांच्या बहीणीला एनएमएमटीच्या तुर्भे आगारामध्ये नोकरीवर घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे म्हात्रे कुटूंबियांनी या प्रकरणी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे जाहिर आभार मानले आहेत. तसेच हा प्रश्न मार्गी लागल्याने उरण पूर्व विभागात अनेक महिन्यापासून बंद असलेली एनएमएमटी बस सेवा आता लवकरच सुरु होणार असल्यामुळे नागरिक, जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
