कडधान्य पिकासह आंबा, काजु पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यात गेली चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कडधान्य पिकांसह आंबा, काजु व इतर फळझाडांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असुन यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेली चार ते पाच दिवसापासून वातावरणात बद्दल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे वाल, मटकी, मुग, हरभरा, चवळी, तूर या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या दिवसात पिकांना सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. परंतु, ढगाळ वातावरणामुळे कडधान्य पिकांची पाने पिवळी पडत असुन त्या पानामध्ये अळी तयार झाली असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आंबा, काजु व इतर फळझाडे यांचे पिक उत्तम प्रकारे यावे म्हणून बागायतीदारांनी महागडी औषध फवारणी केली आहे. तसेच बागायतीची मशागत करुन हजारो रुपये खर्च केले आहेत. परंतु निसर्गाच्या बदलामुळे सर्व मेहनतीवर पाणी फेरेल जाईल अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
खरीप हंगामात भात पिक उत्तम प्रकारे येऊनही शेवटी अती पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या परिस्थितीचा सामना करीत रब्बी हंगामात शेतीची मशागत करून विविध प्रकारच्या कडधान्याची लागवड केली. परंतु, चार पाच दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे कडधान्य पिक धोक्यात आले आहे. तसेच आंबा, काजु व इतर फळझाडांचे मोहोर गळू लागले असुन पुन्हा एकदा शेतकरी वर्गाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
चंद्रकांत लोखंडे
शेतकरी