किरण लाड
नागोठणे : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नदीला आलेले पूर, ठिकठिकाणी दरडी कोसळून मनुष्य तसेच वित्तहानी झाली आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच नागोठण्यात वारंवार लाईट जाण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शुक्रवार, दि. २८ जुलैला रात्री १ वाजता गेलेली लाईट दुपारी १ वाजता आली. म्हणजेच साधारण १२ तास शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मुसळधार पडणाऱ्या पावसाने अंबा नदीला पूर येत असतानाच रात्रभर वीज पुरवठा खंडित असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. महावितरणाच्या अथक परिश्रमाने नागोठणे शहरातील वीज पुरवठा १२ तासानंतर सुरळीत झाला.

नैसर्गिक आपत्ती तसेच इतर कारणांमुळे नागोठण्यातील तसेच विभागातील वीज वारंवार खंडीत होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. रायगड जिल्ह्यात दि. २७ जुलैला पावसाचा आॅरेंज अलर्ट दिला होता. पाऊस धोधो कोसळत होता. अशातच दि. २८ जुलैला रात्री १ वाजण्याच्या सुमारास कानसई सबस्टेशनमधील ट्रान्सफाॅर्मर तांत्रिक कारणामुळे बंद पडला आणि अचानक नागोठणे शहर व विभागातील वीज पुरवठा खंडीत झाला. कानसई सबस्टेशनमधील ट्रान्सफाॅर्मर तांत्रिक बाबींमुळे अचानक बंद झाल्याने त्याचा फटका नागोठण्याला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युतवाहिनी तारांना बसला होता. सहा ठिकाणी विद्युत वाहिनी करणाऱ्या तारा तसेच जम्पर तुटल्याने लाईट येण्यास विलंब होत होता. वीज नसल्याने नागरिकांचे, व्यापारी, दुग्ध व्यावसायिकांचे, पिठाची चक्की, छोट्या घरघंटी, सरकारी कार्यालये, कामगार, तसेच शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते. बारा तास लाईट नसल्याने गृहिणी सुध्दा वैतागलेल्या दिसत होत्या.

नागोठणे तसेच विभागात वारंवार खंडीत होणाऱ्या वीजेमुळे नागरिक हैराण झाले असून महावितरणने यावर वेळीच उपाययोजना करून नागोठणे तसेच विभागातील वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच तांत्रिक कारणांमुळे नागोठणे शहर व विभागातील लाईट जाण्याचे प्रमाण वाढले आहे.तरीही आपण स्व:ता कर्मचाऱ्यांसह शहर व विभागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. नैसर्गिक आपत्ती तसेच तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडीत होत आहे. शुक्रवार दि. २८ जुलैला रात्री १ वाजता काही तांत्रिक कारणामुळे कानसई सबस्टेशन येथील ट्रान्सफाॅर्मर बंद झाला आणि शहर तसेच विभागातील वीजपुरवठा खंडीत झाला. मेन ट्रान्सफाॅर्मर बंद होऊन ब्रेकर टाईमात ट्रीप झाला नाही त्याचा परिणाम वीज वाहिनी करणाऱ्या तारांवर झाला तसेच इतर तांत्रिक बाबींवर झाला. नागोठण्यात सहा ठिकाणी लाईट ब्रेक झाली होती. माझ्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम चालू केली असता, राॅयल मेडिकल समोरच्या ट्रान्सफाॅर्मरचा एक जम्पर गेला होता. आयटीआय येथील दोन्ही साईडचे जम्पर व एक साईडने वायर डिस्क गेले होते. गवळ आळी येथील वाॅशिंग सेंटरजवळ एक जम्पर गेला होता. तसेच रमाईनगर जवळ विद्युत वाहिनी तारा तुटल्या होत्या. आमच्या कर्मचाऱ्यांनी व ठेकेदारांच्या कामगारांनी दिवस, रात्र मेहनत घेऊन विभागातील वेलशेत, आंबेघर, वणी ,कडसुरे, कुहिरे या गावांतील वीजपुरवठा रात्री 3.30 वाजता पूर्ववत केला तर नागोठणे शहरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यास १२ तास लागले. नागरिकांनी, ग्राहकांनी, महावितरणचे कर्मचारी, ठेकेदारांचे कामगार या सर्वांनी दिलेल्या सहकार्याने नागोठणे तसेच विभागातील खंडीत वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे. नागोठणे महावितरण शाखेचा पदभार स्विकारुन मला पंधरा दिवस झाले आहेत. नागोठणे विभागातील वारंवार वीजखंडीत का होते? या समस्यांचा तसेच तांत्रिक बाबीचा अभ्यास करुन त्या सोडविण्याचा तसेच येथील नागरिकांना वीजपुरवठा सुरळीत कसा करता येईल याकडे लक्ष देणार आहे.
– नितीन जोशी,
सहाय्यक कार्यकारी अभियंता,
महावितरण कार्यालय, नागोठणे.
नागोठणे शहरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्यामुळे आम्हाला नाहक त्रास होत आहे. हल्ली रात्री तसेच पहाटे लाईट जाण्याचे प्रमाण वाढल्याने पंखा बंद असतो. त्यामुळे मच्छर त्रास देतात. अशातच मग पुरेशी झोप मिळत नाही. पहाटे, पहाटे झोप लागते. मुलांना शाळेत जायला व मला कामावर जायाला उशीर होतो. दर महिन्याला न चुकता आम्ही वीज बिल भरतो. तसेच या वर्षात एप्रिल महिन्यात विजेचा प्रति युनिट दर वाढलेला आहे. आमच्याकडून या वाढीव दराने वीज बिल घेता मग आम्हां ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत का करीत नाही? तो करावा हीच माझी महावितरणाकडे मागणी आहे.
– रोशन नागोठणेकर,
ग्राहक, केएमजी विभाग नागोठणे