जनतेच्या समस्या मार्गी लावण्याची माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर यांची मागणी
विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यातील रानसई धरण परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या उत्खननामुळे तसेच अनधिकृत बांधकामामुळे रानसई धरण परिसरातील विविध गावांना खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यातच रानसई धरणाचे बांधकामाचे काही भाग निकृष्ट दर्जाचे असल्याने भविष्यात रानसई धरण फूटून धरणातील पाणी विंधणे, कंठवली आदी गावात घुसून नागरिकांच्या जीवाला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामूळे रानसई धरणाच्या बांधकामाची पाहणी करून तिथे चांगले बांधकाम करण्यात यावे, धरण फूटून पाणी बाहेर गावात येऊ नये याची प्रशासनाने दखल घ्यावी.

दिघोडे ते चिरनेर मार्गावर विविध पुलांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे, तिथे पूल दुरुस्त करावेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात विंधणे गाव व कंठवली परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. नागरिकांच्या घरात पाणी जाते त्यावर कायम स्वरूपी उपाय योजना करण्यात यावी तसेच बेकायदेशीर व अनधिकृतपणे चाललेले बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे, राजन खुटी नदीवर पुलाची उंची वाढवावी, विंधणे खाडी वर पुलाची उंची वाढवावी तसेच चिर्ले बैलोंडा खाडी वर पुलाची उंची वाढवावी,दिघोडे हायस्कुले ते कंठवळी गाव पुल दुरुस्ती करण्यात यावी व धोकादायक हायस्टेशन तारेचा शॉक नागरिकांना लागत आहे. त्या बाबतही योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर यांनीही विविध भागातील जनतेच्या समस्या शासनाने त्वरित सोडवाव्यात व बेकायदेशीर व अनधिकृतपणे काम करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.