मुंबई : राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर सुरु असल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि ठाकरे गटाचे मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.
मात्र एकीकडे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही शिवसेना जोडण्यासंदर्भात मंत्री संजय शिरसाट यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना मोठं विधान केलं आहे. संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर ठाकरे गटाकडून कोणती प्रतिक्रिया दिली जाणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील, असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय. दोन शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. दरम्यान या दोघांचे तार जोडले पाहिजेत. मात्र प्रयत्न एका बाजूने करून चालणार नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट यांनी त्यांच्या राजकीय प्रवासासंदर्भातही भाष्य केलं आहे.