मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उपमुख्य़मंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनेकदा त्यांची नाराजीही उघडपणे समोर आली आहे. अलीकडे मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप, पालकमंत्री पदाच्या वाटपापर्यंत तर अनेक कारणावरून भाजप आणि शिंदे गटातील मतभेद जाहीरपणे समोर आले. त्यामुळे महायुती सरकारमध्ये काही आलबेल नसल्याचेही बोलले जात होते. असे असतानाच आता पुन्हा एका एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या बैठकीला दांडी मारत नाराजीच्या चर्चांना बळ दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. ३) सोशल वॉर रूमसंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळले. त्यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे या बैठकीस उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शिंदे ठाण्यावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.
एकीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला काही तासांसाठी स्थगिती देण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीऐवजी महायुती सरकारमध्येच अंतर्गत कुरघोडी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या विश्वासू नेत्यानेही एका कार्यक्रमात मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी थेट मंत्रिपदावर रोखठोक भाष्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. “पहिल्यांदाच आमदार झालेली काही मंडळी कधी पुढे गेली हे कळलेही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे माझ्या मागून आले आणि थेट मंत्री झाले, पण मी अजूनही आमदारच आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.