कोसळलेले काम लपविण्यासाठी टाकली माती, निकृष्ट दर्जाचे काम, नागरिक संतप्त
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाक्यावरील मंगल कार्यालयालगत असणाऱ्या गटारावरील स्लॅबचे काम आठ ते दहा दिवसांपूर्वी केले होते. परंतु, दहा दिवसात या गटारावरील स्लॅब कोसळला. हे निकृष्ट दर्जाचे काम लपविण्यासाठी कोसळलेल्या स्लॅबवर माती टाकण्यात आली. यामुळे या कामाचा दर्जा आहे तरी कसा? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील शिवनेरी मंगल कार्यालयाच्या नजिक असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या बाजुने जाणाऱ्या गटारावरील स्लॅबचे काम हे आठ ते दहा दिवसांपूर्वी केले असुन हे केलेले काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा स्लॅब काही दिवसातच कोसळला आहे. आंबेवाडी बाजारपेठेतील हे गटार तीन ते चार वर्षांपासून खोदलेले होते. या खोदलेल्या गटारात गेल्या वर्षी एक पिकअप टेम्पो वळण घेण्याच्या नादात गटारात गेला. सुदैवाने पिकअप चालक थोडक्यात बचावला. परंतु या बाजूला वस्ती असल्यामुळे या गटारावरून रहिवाशी नागरिक ये-जा करीत असतात. तसेच शालेय विद्यार्थी व पोस्टात जाणारे नागरिक याच मार्गाने जात असतात. अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून सुरु असुन या कामात कोणतीही प्रगती झाली नसल्याचे दिसून आले. अनेक वेळा रस्त्याच्या डेडलाईन दिल्या. परंतु रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. आता विधानसभा निवडणुकीनंतर येत्या डिसेंबर २५ अखेर या महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी नवीन डेडलाईन देण्यात आल्यामुळे ठेकेदाराच्या मनमानीनुसार काम सुरु आहे. परंतु कामात कोणताही दर्जा दिसून येत नाही. अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण?
-चंद्रकांत लोखंडे
सामाजिक कार्यकर्ते आंबेवाडी