घन:श्याम कडू
उरण : नगरपालिका हद्दीतील विमला तलावामधील साचलेला कचरा उचलून साफसफाई करण्यात आली. मात्र गेली अनेक दिवसांपासून कोसळलेला कठडा दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. तरी सदरचा कठडा त्वरित दुरुस्त करून ज्येष्ठ नागरिक व पादचारी यांना मॉर्निंग वॉक करण्यासाठी सोयीचे होईल. एवढेच नाहीतर तलावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या ठिकाणचा परिसर व महाराजांच्या पुतळ्यावर धुळ साचली होती.
विमला तलावात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. याबाबत पत्रकारांनी आवाज उठविल्यानंतर मुकादम धनेश कासरे यांनी स्वतः जातीने उभे राहून कचरा साफ करून घेतल्याने परिसर स्वच्छ दिसत आहे. तरी नेहमी परिसर असाच स्वच्छ ठेवण्यात यावा. विमला तलाव हे लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांना फायद्याचे ठरत आहे. लहान मुले खेळण्यासाठी तर तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सकाळ संध्याकाळ वॉक करण्यासाठी वापर करीत विमला तलावाभोवती फेरफटका मारीत असतात. परंतु काही दिवसांपूर्वी तलावाच्या एका बाजूचा कठडा तुटल्याने त्याचा त्रास सर्वाना सहन करावा लागत आहे. याबाबत वृत्त प्रसिद्ध होऊन १० ते १५ दिवसांचा अवधी उलटूनही नगरपालिका प्रशासनास याकडे लक्ष देण्यास सवड नसल्याचे दिसत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. तसेच या तलावामधील खेळण्यांची दुर्दशा झाली आहे, याकडेही लक्ष नाही.
तलावामधील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर धुळीचे तसेच परिसरात पालापाचोळा याचे साम्राज्य दिसत होते. सदर ठिकाणी एका कार्यक्रमानिमित्त माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, माजी नगरसेवक अतुल ठाकूर व इतर मान्यवर आले असता त्यांनी नाराजी व्यक्त केली. माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरल्यानंतर प्रशासनाने साफसफाई केली. यावरून नगरपालिका प्रशासन हे देशाच्या थोर विभूतींकडे दुर्लक्ष करून भ्रष्ट कारभार करण्यात तल्लीन असल्याने जनतेत नाराजीचा सूर निघत आहे.