पक्षात ज्याची पत नाही त्याची वट
घनःश्याम कडू
उरण : राजकीय घडामोडीत दररोज कोणाचा तरी कोणत्या तरी पक्षात प्रवेश होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उरणमध्येही राजकीय पक्षांतराची लागण लागली आहे. उरण काँग्रेसमधील नाराज गट पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समजते.
उरण काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजीचा सूर वाढत चालला आहे. पक्षात ज्यांची पत नाही अशा स्थानिक पदाधिकार्यांवर वरिष्ठांची मर्जी संपादन करून त्यांना मानाची पदे दिली जात आहेत. ज्यांच्याकडे मतदानाच्या दिवशी टेबल मांडण्यासाठी कार्यकर्ते नसतात व स्वतःच्या घरातील व्यक्ती शिवाय मतदान नाही त्यांच्याकडे पदांची खिरापत वरिष्ठांनी बहाल केली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेतल्यानेच या दोन्ही निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली असल्याचा आरोप काही पदाधिकारी खासगीत करतात.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात ही कोणत्याही प्रकारची मोर्चेबांधणी करण्यासाठी नियोजन केले जात नाही. तसेच पक्षात उरणमधील ठराविक पदाधिकार्यांनाच मान मिळत असल्याने नाराज पदाधिकारी वेगळी चूल मांडून सत्ताधारी राष्ट्रवादी गटात (अजितदादा पवार) सामील होण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
याबाबत नुकतीच काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकार्याच्या स्वतःच्या फार्म हाऊसवर बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपस्थितांनी आपली नाराजी व्यक्त करीत आपण सत्ताधारी गटात सामील होण्याचे ठरले आहे. त्यामध्ये आपले गेली अनेक वर्षे सहकारी असलेले खासदार सुनील तटकरे यांच्या बरोबर चर्चा करून आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होण्यासाठी प्रयत्न करू या असे ठरले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समजली आहे.
उरण काँग्रेस पक्षातील नाराज गटाची नाराजी दूर करण्यात वरिष्ठांना यश येते की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात याकडे लक्ष लागले आहे. उरण काँग्रेसमध्ये नाराज मोठ्या प्रमाणात असून लवकरच त्याचा स्फोट होईल अशी माहिती उरण काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकार्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते नाराज असून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.