विद्यार्थ्यांसह रहिवाशी नागरिक तसेच प्रवाशांचे हाल
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरुन कोलाड हायस्कूल कोलाडकडे जाणाऱ्या रस्त्याचे तीनतेरा वाजले असुन रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणारे विद्यार्थ्या, रहिवाशी नागरिक तसेच प्रवाशी यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

या मार्गावर प्राथमिक मराठी केंद्र शाळा, द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रहिवाशी वस्ती तसेच मधून जवळचा मार्ग असल्यामुळे धाटाव एमआयडीसीमध्ये कामावर जाणारे गावातील अनेक कामगार याच मार्गाने ये-जा करीत असतात. गेली दोन ते तीन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून हा रस्ता अरुंद असल्यामुळे या रस्त्यातून मार्ग काढताना प्रवाशी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पावसाळ्यात तर या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून खड्डे दिसत नाहीत. यामुळे या मार्गावर अपघात होतांना दिसत आहेत. गेल्या पावसाळ्यात या मार्गानी जाणारे शालेय विद्यार्थी खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे टुव्हीलर स्लिप होऊन खाली पडले, परंतु सुदैवाने ते थोडक्यात बचावले. यामुळे ‘गाव तेथे रस्ता’ हे शासनाचे ब्रिद वाक्य कागदावर राहिले असल्याचे दिसून येत आहे. या मार्गाने प्रवास करणारे विद्यार्थी, शिक्षक, रहिवाशी नागरिक, कामगार यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असुन कोणाचा नाहक बळी गेल्यानंतर या रस्त्याचे काम पूर्ण होईल काय? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.