वाहतुक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना करण्याची गरज
विश्वास निकम
कोलाड : मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील कै. द. ग. तटकरे मुख्य चौकातील उड्डाणपुलाचे काम गेली अनेक दिवस ठप्प झाले होते, त्यामुळे नाक्यावर अनेक समस्यांना नागरीकांना सामोरे जावे लागत होते. मात्र, उड्डाणपुलाचे काम पुन्हा कमालीची यंत्रणा लावत सुरू झाले आहे. ही आनंदाची बाब आहे तर दुसरीकडे हे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीवर नियंत्रणाची गरज असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुल व रस्त्याच्या कामात दिवसेंदिवस विलंब होत असल्यामुळे या समस्यमुळे ग्रासलेले कोलाड आंबेवाडी वरसगाव विभागातील नागरिक कमालीचे हैराण होत असल्याचे दिसून येत होते. सदरच्या ठप्प झालेल्या कामाचा तसेच त्याच्या विलंबाच्या कामाबाबत अनेक वृत्तपत्राने पाठपुरावा केला तसेच या रखडलेल्या कामाबाबत येथील ग्रामस्थ नागरिकांकडून याबाबत उपविभागीय दंडाधिकार रोहा यांना लेखी तक्रार निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यानंतर आता पुन्हा या उड्डाणपुलाच्या कामात गती आली आहे. मात्र काम सुरू असताना वाहतुक कोंडीवर नियंत्रणाची गरज असल्याची मागणी होत आहे. तसेच संबंधित वाहतूक यंत्रणेने देखील यावर अधिक लक्ष केंद्रित करून यावर अधिक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.
मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील कै. द. ग. तटकरे चौकातील उड्डाणपुलाचे काम गेली अनेक दिवस ठप्प होते. मात्र त्या कामाला पुन्हा गती येताना दिसून येत आहे. याचा आनंद आहे. मात्र हे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित खात्याने तसेच ठेकेदाराने शर्थीचे प्रयत्न करून येथील नागरिकांच्या घशा तोंडात जाणारी धूळ आणि वाढती वाहतूक कोंडी यावर अधिक उपाययोजना करण्यात यावी मार्गावर जड अवजड वाहनांची वाहतूक तसेच त्याला जोडला गेलेला. रोहा मार्ग त्यामुळे भरचौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यावर ठोस उपाययोजना संबंधित खात्याकडून करण्यात यावी त्याच बरोबर नियमित वाहनचालकांनी देखील वाहतुक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे .
-डॉ. मंगेश सानप
सामजिक कार्यकर्ते, कोलाड
