रायगड : पंचांचा निर्णय अंतिम असतो, मात्र तो निर्णय अनेकांना मान्य नसतो असं वक्तव्य करत सुनिल तटकरे यांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावले यांना डिवचलं. माणगावमध्ये नामदार आदिती तटकरे चषकच्या उद्घाटन प्रसंगी रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. अलिबाग मुरुड मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, सुनिल तटकरेंच्या वक्तव्याला आमदार महेंद्र दळवी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तटकरेंनी मारलेली कोपरखळी आमच्या लक्षात आलेली आहे. तटकरे हे राष्ट्रीय कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. तटकरे हे क्रिकेट विषयी जास्त जाणकार असतील परंतू, कबड्डी विषयी आम्हाला जास्त माहिती आहे असा टोला आमदार दळवी यांनी लगावला. सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये जो काही पालकमंत्री पदाचा खेळ सुरु केलाय, त्या खेळाला नक्कीच दोन दिवसात उत्तर मिळेल असा इशारा देखील दळवी यांनी दिला आहे.
पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्रीपद हे आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी याला जोरदार विरोध केला. मंत्री भरत गोगावले यांनाच रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री करावं, अशी मागणी होत होती. त्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. नाशिक जिल्ह्यात देखील गिरीश महाजन यांना पालमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता नवीन नियुक्त्या कधी होणार? पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्यांमध्ये जोरदार टीका टिपण्णी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पालकमंत्रीपदाबाबत लवकरच निर्णय लागेल अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली आहे.