रायगड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत रास्त भाव धान्य दुकानातुन धान्य वाटप करण्यात येते. तरी सर्व कार्डधारकांनी दरमहा पंधरा तारखेपर्यंत धान्य उचल करावी. तसेच सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांनी विहीत वेळेत वाटप, करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.
प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला अन्न दिन व पुढील सप्ताहात अन्नसप्ताह साजरा करणे व या पंथरा दिवसात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना धान्य वाटप करणे अशा शासनाच्या सुचना आहेत. त्यामुळे कोणत्याही लाभर्थ्यांनी महिन्याच्या शेवटी धान्य उचलायला न जाता या पंधरा दिवसात धान्याची उचल करावी. रास्त भाव धान्य दुकानदाराने या कालावधीत दुकाने चालु राहतील, कोणताही लाभार्थी दुकानातून परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी. संबंधित कार्डधारकाने काही समस्या उद्भवल्यास तहसिलदार कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहनही श्री. सोनवणे यांनी केले आहे.