टँकरद्वारे पाणी पुरवठा, नागरिकांमध्ये तीव्र संताप
घनःश्याम कडू
उरण : उरण शहरात उन्हाळा सुरू होण्याआधीच भीषण पाणी टंचाईचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाण्याची मागणी वाढल्याने आणि उपलब्धतेत घट झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. शहरात पुनर्विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यानंतरच पाणीपुरवठा अनियमित झाल्याचे दिसून येत आहे.
असुरक्षित खड्ड्यांमुळे दुर्घटनेचा धोका!
शहरात पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी काही ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, 16-20 दिवसांपासून हे खड्डे उघडे पडून आहेत. बाजारपेठेसारख्या गर्दीच्या भागात मोठ्या खड्ड्यांभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. या खड्ड्यांमध्ये पडून एखादी दुर्घटना घडल्यास, जबाबदारी कोण घेणार? प्रशासनावर गुन्हा दाखल करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
नगरपालिकेची गंभीर दखल आवश्यक
रहिवाशांच्या जीवाशी खेळणार्या या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपालिकेने त्वरित ठोस उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा इशारा द्यावा लागेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
नगरपालिकेच्या निष्क्रीयतेवर रहिवाशांचा संताप
सोसायटीच्या कमिटीने वारंवार नगरपालिका मुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा अधिकार्यांकडे तक्रार केली आहे. 15-20 दिवस उलटूनही समस्येवर उपाय न केल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे.
नगरपालिका कर्मचारीही अनभिज्ञ?
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही ठिकाणी खोदकाम करून खड्डे मारण्यात आले आहेत. मात्र, अजूनही पाणी मिळत नसल्याने नक्की काय अडचण आहे, हे प्रशासनालाच समजत नाही. त्यामुळे हा पाणी प्रश्न मार्गी लागणे कठीण बनले आहे.
पाणी नसले तरी कर भरणे बंधनकारक?
उरण नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, कर वेळेवर भरूनही जर नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असेल, तर त्याची भरपाई नगरपालिका कशी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.