बेकायदा बॉक्साईट उत्खननावरून ग्रामसभा गाजली
खुजारे येथील बेसुमार उत्खननाकडे दुर्लक्ष असल्याची तक्रार
बोर्लीपंचतन पंचक्रोशीतील नागरिकांचा जनआंदोलनाचा इशारा
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे येथे सुरु असलेल्या बॉक्साईट खाणीविरुद्ध हनुमानवाडी खुजारे येथील स्थानिक रहिवाशी आक्रमक झाले असून शुक्रवारी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत बॉक्साईट उत्खननाला जोरदार विरोध करण्यात आला.
दिवेआगर पर्यटन स्थळाजवळील खुजारे या गावाला जोडून असलेल्या स्थानिक नागरिकांच्या मालकी जागेत बॉक्साईट खाण आहे. तेथील उत्खननामुळे येथील निसर्गरम्य पर्वत पूर्णपणे नष्ट होत असल्यामुळे येथील बॉक्साईट मायनिंग प्रकल्प तातडीने बंद करण्यात यावा याबाबत आजूबाजूच्या मुंबई स्थित चार गावातील ग्रामस्थांनी दोन दिवसापूर्वी मुंबईत बैठक घेतली. त्यानुसार शुक्रवारी खुजारे ग्रामपंचायतची ग्रामसभा घेण्यात आली.
खाणी ठिकाणी ग्रामपंचायत परवानगी न घेता गुरुचरण जागेत उत्खनन सुरु आहे, शेड बांधली आहे तसेच वजन काटा आणि साठा हि करत आहेत. खुजारे गावाच्या डोंगर कडेपर्यंत उत्तखनन आले आहे. यामुळे कधीही भूस्खलन होण्याची शक्यता आहे.
आत्माराम महाडिक, माजी सरपंच, खुजारे.
मागील तेरा वर्षापूर्वी आशापुरा कंपनीकडून याठिकाणी होत असलेल्या बॉक्साईट खाणी बंद करण्यात आले असतानाच आता पुन्हा एकदा खुजारे परिसर संघर्षाच्या पवित्र्यात उभा ठाकला आहे. मात्र, यावेळी बोर्लीपंचतन परिसरातील जनतेचा पाठिंबा मिळत असल्याने बॉक्साईट उत्खननावरून आणखी एक संघर्ष सुरू होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
यावेळी खुजारे येथे भरतेश कन्ट्रक्शन या कंपनीने मोठया प्रमाणात बॉक्साईट मालाचे उत्खनन करताना सुरुंग स्फोट घडवून तसेच पोकलन मशिन व जेसीबी मशिनद्वारे उत्खनन करुन येथील डोंगरपर्वत पूर्णपणे उध्वस्त केल्यामुळे या पर्वताला मोठमोठ्या भेगा पडून जमीन कमकुवत झाल्यामुळे गाव वस्तीच्या माथ्यावर भूस्खलनाचा धोका निर्माण झालेला आहे. ग्रामस्थांनी येथील बॉक्साईट खाण ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी सर्व अडचणी ग्रामसभेत मांडल्या. खुजारे हनुमानवाडीतील गावकऱ्यांनी बॉक्साईट खाणीविरोधात आक्रमक भूमिका घेत काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
खुजारे येथील खाणीत शेतकऱ्यांची फसवणूक करून अत्यल्प दराने जमिनी घेऊन प्रचंड प्रमाणावर उत्खनन होत आहे. तर काहींच्या आंबा, काजूच्या बागा न विचारता उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
-निलेश खेडेकर, ग्रामस्थ.
बेकायदा उत्खननावर कोणाचे नियंत्रण राहिले नाही. शासनाचेच दुर्लक्ष आमच्या व जैवविविधतेच्या जीवावर आले आहे. सततच्या धुळीमुळे येथील झाडांवर उत्पादकतेवर पारिणाम होत आहे. खुजारे ग्रामस्थांना धुळीचा त्रास होऊन, जिवंत पाण्याचे स्त्रोत्र बंद पडल्याने पाणी संकट आलं आहे. हे काम थांबले नाहीतर जन आंदोलन छेडले जाईल.
-मधुकर ठसाळ, ग्रामस्थ