• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणच्या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच; दोन दिवसांत दोन तरुण दगावले

ByEditor

Feb 22, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
उरण तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. जासई दास्तान-चिर्ले रेल्वे उड्डाण पुलावर शुक्रवारी (दि. २१) रात्री ९-३० च्या सुमारास एका अज्ञात टेम्पो चालकाने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून अपघातग्रस्त टेम्पो चालक फरार झाला आहे. मोहम्मद जफिर मोहम्मद समीर शहा (वय ४५) असे मयत युवकाचे नाव असून या तरुणावर अंत्यसंस्कार होतात न होतात तोच गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर ट्रेलरने मोटारसायकलस्वाराला जांभूळपाडा बस स्थानकाजवळ चिरडून टाकल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर अपघात हा शनिवारी (दि. २२) सायंकाळी ५ च्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे.

रस्ते व वाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिवाळी अधिवेशनात वाढत्या अपघाताबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. परंतु यावर प्रशासन ठोस उपाययोजना करत नसल्याने अपघाताचे सत्र हे कमी न होता वाढतच आहे. त्यात महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको तसेच संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज उरण तालुक्यात अनाधिकृत कंटेनर यार्डचे बस्तान वाढत आहे. अशा कंटेनर यार्डमध्ये कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांची ये-जा ही रहदारीच्या रस्त्यावर वाढत आहे. त्याचा परिणाम हा अपघातातील निष्पाप तरुणांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या सदस्यांना सहन करावा लागत आहे.

शुक्रवारी (दि. २१) रात्री ठिक ९-३० च्या सुमारास चिर्ले मार्गावरुन मोटरसायकलस्वार दास्तान फाट्याकडे रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पूलावरुन जात असताना पुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो चालकाने त्यास धडक दिली आणि अपघातग्रस्त टेम्पो चालक फरार झाला. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा उपचारा अभावी जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहम्मद जफिर मोहम्मद समीर शहा (वय ४५) असे अपघातग्रस्त मयत युवकाचे नाव असून या तरुणावर अंत्यसंस्कार होतात न होतात तोच गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरुन भरधाव वेगाने जांभूळपाडा येथून जाणाऱ्या कंटेनर ट्रेलरने मोटारसायकलस्वाराला चिरडून टाकल्याची घटना शनिवारी (दि. २२) सायंकाळी ठिक ५ च्या सुमारास घडली. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून सदर मयत युवक हा पनवेल तालुक्यातील वावंजे गावातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या दोन्ही अपघाताची माहिती उरण पोलिसांना तसेच उरण वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे सुरू केले आहेत. मात्र महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको तसेच संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उरणचे रस्ते हे निष्पाप तरुणांच्या रक्ताने माखत असून उरणमधिल रस्त्याजवळील अनाधिकृत कंटेनर यार्ड, इतर बांधकामे, भंगाराची दुकाने, बेशिस्त अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी संतप्त प्रवाशी नागरिक करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!