• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावर आंबेवाडी बाजारपेठेत रस्त्याला मोठे भगदाड

ByEditor

Feb 22, 2025

महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह?

विश्वास निकम
कोलाड :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी बाजारपेठेतील रोहा बाजुकडे जाणाऱ्या रहदारीच्या मुख्य चौकात गटाराच्या बाजूला रस्त्याला भलेमोठे भगदाड पडले असुन या खड्ड्यात चारचाकी वाहन जाता जाता सुदैवाने थोडक्यात बचावले असुन यामुळे ठेकेदारांनी केलेले काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे सिद्ध झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अठरा वर्षांपासून सुरु आहे. अनेकवेळा या महामार्गाची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण तसेच दोन दिवसापूर्वीच विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणी केली व हे काम येत्या गणपती उत्सवापूर्वी पूर्ण होईल असे सांगितले आहे. परंतु फक्त “तारीख पे तारीख” मिळत असल्याने यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. जनतेने डिसेंबर २०१८ पासुन आजपर्यंत दिलेल्या डेडलाईनचे जाहीरतीचे फलक लावून सहा वर्षापासुन महामार्गाचे काम न झाल्याचे पाहिले आहे.

लोकप्रतिनिधींकडून फक्त अनेकवेळा मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली जात आहे, परंतु निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदाराला कोणीही जाब विचारत नसल्यामुळे ठेकेदाराची मनमानी सुरु आहे हे आंबेवाडी बाजारपेठेत भर रहदारीच्या चौकात गटाराच्या बाजूला पडलेल्या भल्यामोठ्या भगदाडावरून अधोरेखित होत आहे. तसेच विविध ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कोलाड गोद नदीवरील जुना पुल तसाच ठेऊन दोन्ही बाजूचे कठडे नवीन बांधण्यात आले आहेत, तसेच वाकण जवळील गोडसई गावानजिक पुलाची अवस्था तशीच आहे. भुवन गावानजिक पुलाचा पत्ताच नाही तर कठडे अजूनही तुटलेल्या अवस्थेत आहेत. या महामार्गाचे काम वेगात करण्याच्या नादात अशी कामे सुरु असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पत्रकार, तसेच अनेक सामाजिक संघटना यांनी रस्तारोको करून आवाज उठवला. अनेक व्यवसाय उध्वस्त झाले. व्यावसायिकांना कोणतीही सबब न देता त्यांच्या दुकानावर बुलडोझर फिरवण्यात आले. मात्र या कामाला १८ वर्षे झाली तरी हे काम पूर्ण होत नाही. याला प्रशासनाचे ठेकेदारावर नसलेले नियंत्रण तसेच नियोजन शुन्य कामामुळे अनेक वर्षे हे काम रखडले असल्याचे दिसून येत आहे. परंतु यामुळे असंख्य प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे व त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. याला जबादार कोण? असा संतप्त सवाल प्रवाशी वर्गातून उपस्थित करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!