‘ऑपरेशन टायगर’च्या निशाण्यावर राज ठाकरे यांची मनसे आल्याची माहिती
मुंबई : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी सकाळीच भेट घेतली. या भेटीत मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावर चर्चा झाल्याचं उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितलं. परंतु या बैठकीतील आतली बातमी समोर येत आहे. शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या निशाण्यावर चक्क राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आल्याची माहिती आहे. मनसे फोडण्याचा विचारही करु नका, असं राज ठाकरेंनी सामंतांना बजावल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शिवसेनेच्या मिशन टायगरच्या निशाण्यावर मनसे आल्याची चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या जिल्हाध्यक्षांना उदय सामंत यांनी फोन केला आणि शिवसेनेत येण्याच्या ऑफर दिल्या होत्या. यापैकी काही जणांना तर थेट महामंडळ देण्याचे आश्वासन दिले होते, अशी माहिती आहे. इतकंच नाही, तर मंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर यासंदर्भात एक बैठक देखील झाली होती. ही माहिती राज ठाकरे यांना समजल्यानंतर दोन दिवसांपूर्वी संबंधित जिल्हाध्यक्षांसोबत राज ठाकरेंनी बैठक देखील घेतली. आत्ता माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीये, त्यामुळे पुढचा निर्णय तुमचा आहे, असं राज ठाकरे यांनी जिल्हाध्यक्षांना सांगितलं. त्यानंतर या सर्व जिल्हाध्यक्षांनी मनसेतच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या राजकीय घडामोडींनंतर स्वतः राज ठाकरे यांनी उदय सामंत यांना आज बोलावून घेतलं आणि या संदर्भात जाब विचारला. मिशन टायगरमध्ये मनसे फोडण्याचा विचार सोडा, असं राज ठाकरे यांनी उदय सामंत यांना स्पष्ट सांगितल्याची माहिती आहे.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले होते, की राज ठाकरे हे असे व्यक्तिमत्त्व आहे की, राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या, तरीही आपल्या ज्ञानात भर पडते. विश्व मराठी साहित्य संमेलनाला स्वत: राज ठाकरे उपस्थित होते, त्यांचे आभार मानण्यासाठी मी आलो होतो. अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची बैठक राज्यातील विकास कामांबद्दल आहे. केंद्रातून राज्यात निधी कसा जास्तीत जास्त आणायचा आणि अमित शहा यांच्या हस्ते वीस लाख लोकांना घरे देण्याचा उपक्रम आहे, असं सामंत म्हणाले होते.