रात्रीच्या वेळी जाळपोळ करीत असल्याने आगीचा धोका; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्रतिनिधी
नागोठणे : मुंबई-गोवा महामार्गालगत असलेली अनधिकृत भंगार गोदामे धोकादायक असून या गोदामांमधून विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांची जाळपोळ होत असून यामुळे आगीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. तसेच या भंगार गोदामांमध्ये पहाटेच्या वेळेस विविध पदार्थांची जाळपोळ होत असून यावेळी मॉर्निंग वॉक करिता निघालेल्या ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
मुंबई गोवा महामार्गाला खेटूनच हि गोदामे थाटली असून विविध प्रकारच्या भंगाराचा साठा या गोदामात केला जात आहे. दिवसेंदिवस या गोदामांचा विस्तार वाढत जात असून या अनधिकृत भंगाराच्या साठ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या भंगार गोदामात रात्रीच्या सुमारास विशिष्ट प्रकारच्या रासायनिक भंगाराची जाळपोळ केली जात असून यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होत असून या धूराचा त्रास लगतच्या ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.
नागोठणे ते कोलाड दरम्यान अशी अनेक अनधिकृत भंगाराच्या गोदामे महामार्गालगत तसेच नागरी वस्तीला खेटून सुरु आहेत. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सुरु असलेल्या या गोदामांकडे प्रशासनाचे देखील दुर्लक्ष होत आहे, अग्निशमन यंत्रणा आणि इतर सुरक्षा मापदंड पायदळी तुडवून, विनापरवाना हे उद्योग खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे आगीसारख्या दुर्घटना घडून निष्पाप कामगार, नागरिक व रहिवाशांचा बळी जाण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ ती आमची जबाबदारी नाही, असे म्हणत जबाबदारी झटकत आहेत. मग, याला जबाबदार कोण, असे म्हणत शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नियम फाट्यावर मारत नागोठणे व आजूबाजूच्या परिसरात भंगार गोदामे बिनदिक्कतपणे सुरू आहेत. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने राजरोसपणे हि गोदामे सुरु असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे.
नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून रिकामी जागा दिसेल तिथे रातोरात भराव करून बांधकाम उभे राहत आहे. रस्त्याच्या कडेलाच हि बांधकामे होत असून यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. मात्र प्रशासन डोळेझाक करीत असल्याने दिवसेंदिवस या बांधकामांमध्ये वाढ होताना दिसत आहे.