शिवसेना युवासेना कासू विभाग प्रमुख प्रतीक बैकर यांच्या पाठपुराव्याला यश
समुद्राचे पाणी शेतात व घरात साचण्याच्या त्रासापासून मुक्तता
रायगड : गेल्या अनेक वर्षांपासून समुद्राच्या भरतीचे पाणी शेतात व घरात येण्याच्या त्रासापासून आता धरमतर येथील ग्रामस्थांची सुटका झाली आहे. वावे वडखळ हद्दीतील धरमतर गावातील दिड किलोमीटरची बांध बंदिस्ती गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाली होती. त्यामुळे जवळच असणाऱ्या समुद्राचे पाणी तेथील लोकांच्या राहत्या वसाहतीत आणि घरात येऊन परिसर संपूर्णतः जलमय होत होता. याचा नाहक त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत होता.
खाडी लगतच्या या बांध बंदिस्तिची दुरुस्ती व्हावी याकरिता शिवसेना युवासेना कासू विभाग प्रमुख प्रतिक मोहन बैकर यांनी ग्रामस्थांसह खारभूमी विभागाला तसेच तहसील कार्यालयाला निवेदन पत्र दिले होते. बांध बंदिस्तिची दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा यावेळी खारभूमी विभागाला देण्यात आला होता. तसेच पेण सुधागड विधानसभेचे आमदार रवीशेठ पाटील, अलिबाग मुरूड रोहा विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी आणि वडखळ ग्रामपंचायत यांच्या सहकार्यामुळे या कामास गती मिळाली.
जवळपास 22 वर्षं प्रलंबित असणाऱ्या बांध बंदिस्तीच्या दुरुस्तीचे काम अखेर शिवसेना युवासेना कासू विभाग प्रमुख प्रतिक मोहन बैकर यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या शेतात आणि घरात येणाऱ्या समुद्राच्या उधानाच्या पाण्यापासून मुक्तता मिळाली आहे.