• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण नगरपालिका व वीज विभागाचा भोंगळ कारभार; पाण्याच्या पाईपलाईनवरच भूमिगत वीज केबल!

ByEditor

Feb 25, 2025

घनःश्याम कडू
उरण :
उरण शहरात भूमिगत वीज केबल टाकण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र, या कामातील हलगर्जीपणा आणि सुरक्षेची अनास्था समोर आली असून, नगरपालिका व वीज विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहरातील विजेचे खांब हटवून भूमिगत वीज केबल टाकण्यात आली आहे. मात्र, नियमानुसार आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना न करता हे काम केल्यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. ठेकेदारांनी या कामात मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन केले असल्याचे स्पष्ट होत आहे.

पाण्याच्या पाईपलाईन भोवतीच वीज केबलचा विळखा!

वीर सावरकर मैदानाजवळ पाण्याच्या पाईपलाईनमध्ये समस्या आल्याने नगरपालिका कर्मचार्‍यांनी खोदकाम सुरू केले. तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला – पाण्याच्या पाईपलाइनवरच विजेची भूमिगत केबल उघड्यावर फक्त दोन-तीन इंच खोल खड्ड्यात टाकण्यात आली होती. या वीज केबलमधून विद्युत प्रवाह सुरू असल्याने खोदकाम करताना केबलला फटके बसले आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, पुढील वेळेस असा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. खोदकाम करताना नगरपालिका कर्मचारी किंवा रहिवाशांना विजेचा शॉक बसला असता, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सदरचे खोदकाम करत असताना नपा कर्मचार्‍यांना शॉक लागला असल्याची माहिती कर्मचार्‍यांनी दिली.

पावसाळ्यात मोठ्या दुर्घटनेचा धोका!

पावसाळ्यात या केबलला घाव बसल्यास किंवा छिद्र पडल्यास, त्यामध्ये पाणी मुरण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाच्या पाण्यात विजेचा करंट उतरू शकतो, ज्यामुळे मोठा अपघात घडू शकतो.

जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

शहरात पाणी टंचाई असल्याने पाईपलाइनमध्ये वारंवार दुरुस्ती करावी लागते. मात्र, पाणीपुरवठा आणि वीज यांसारख्या मूलभूत सेवांसोबत खेळ करून ठेकेदार आणि संबंधित विभाग निष्काळजीपणा करत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. याची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

विद्युत विभाग व नगरपालिका प्रशासनाने जबाबदारी घ्यावी

या प्रकरणाची गंभीर दखल घेत, नगरपालिका आणि वीज विभागाने तत्काळ योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात. सर्व भूमिगत वीज केबल्सची तपासणी करून सुरक्षेच्या दृष्टीने सुधारणा करावी. केबल्स पाण्याच्या पाईपलाइनपासून सुरक्षित अंतरावर हलवाव्यात. संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून, दोषींना जबाबदार धरावे.जर वेळीच उपाययोजना झाली नाही, तर हा निष्काळजीपणा भविष्यात जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालणे अत्यावश्यक आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!