• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कर्जत तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना आमसभेचा विसर?

ByEditor

Feb 25, 2025

तालुक्यात आमसभा होणार का? जनतेचा सवाल

गणेश पवार
कर्जत :
आमसभा ही एका आर्थिक वर्षाकरिता असते. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात आमसभा होणे गरजेचे आहे. आमसभेमुळे जनतेला प्रत्यक्षात सर्व विभागांच्या कामांची माहिती तसेच प्रत्येक होणाऱ्या विकास कामात पारदर्शकता हि निर्माण होते. तसेच जनतेला अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी थेट संवाद साधता येतो आणि आपले प्रश्न, समस्या त्यांच्या समोर मांडता येतात. तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर स्थानिक आमदार, खासदारांसह लोकप्रतिनिधींच्या समोर चर्चा होऊन त्याची सोडवणूक व्हावी या हेतूने वर्षाला आमसभा घ्यावी, असे संकेत आहेत.

महाराष्ट्र राज्यात १९६२ त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्था अस्तित्वात आली. त्यावेळी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती व्हावी, तालुक्यातील जटील प्रश्न मार्गी लागावेत यासाठी १९६७ ला आमसभा घेण्याचा निर्णय झाला. पण हे करत असताना त्याला संविधानिक अधिकार दिला गेला नाही. त्या सभेला स्वत: जिल्हा परिषदेच्या व पंचायत समिती अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्या दिवशीच्या कामाचे प्रोसिडिंग झाले पाहिजे. त्यानुसार वर्षभरात त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित असते. गेल्या ५० वर्षांत सुरुवातीचा कालावधी सोडला, तर अलीकडे आमसभांचा विसरच हा प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींनाही पडला असल्याचे वास्तव समोर येत आहे. वास्तविक या आमसभांमधून तालुक्यातील प्रश्न मार्गी लागत असल्याने, या आमसभा तालुक्याच्या केंद्रस्थानी मानल्या गेल्या पाहिजेत.

कर्जत तालुक्याचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या कार्यकाळात मात्र वार्षिक आमसभा पार पडल्याचे दिसत होते. सन २०१९च्या विधानसभा निवडणूकीमध्ये माजी आमदार सुरेश लाड यांचा पराभव करत शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे हे निवडून आले. मात्र कोरोनाचा सन २०२० मध्ये संपूर्ण भारत देशात प्रसार झाल्याने सन.२०२२ पर्यंत लॉकडाऊन असल्याने, लोकांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने व शासनाची तशी बंदी असल्याने संपूर्ण देशात व राज्यात अशा आमसभा झाल्या नाहीत. मात्र कर्जत तालुक्यात सन २०२३-२४ व सन २०२४-२५ची आमसभा झाली नसल्याचे वास्तव समोर येत आहे. कर्जत तालुक्याची ओळख ही अति दुर्गम आदिवासी बहुल भूमाग अशी आहे. कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्या वस्त्या तसेच ग्रामिण भागातील समस्यांचे, तसेच सुरू असलेल्या विकास कामांपैकी राबवलेल्या कामांविषयीचे प्रश्न लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या पुढे मांडण्याच्या ग्रामस्थ व नागरिकांच्या अधिकारावर घाला घालण्याचे काम होत आहे का? असा देखील प्रश्न तालुक्यातील नागरिक व काही राजकिय पुढाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. यावरून कर्जत तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना आमसभेचा विसर पडला आहे का? तसेच कर्जत तालुक्यात आमसभा होणार का? असे एक ना अनेक प्रश्न समोर येत आहेत.

आता मार्च महिना हा आर्थिक हिशोबाचा असल्याने या महिन्यात आमसभा घेता येणार नाही. तरी साधारण एप्रिल महिन्यात आमसभा घेता येईल, तसे मी आमदार साहेब यांच्याशी बोलून त्यांची वेळ घेऊन आमसभेची वेळ व तारीख निश्चित करतो.

सुशांत पाटील,
गट विकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!