महाड : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव येथे नीरा देवघर धरणाच्या पाण्यात पर्यटकांची मोटार कोसळली. त्यात बुडून एका तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला; तर एकजण जखमी तर एकजण बेपत्ता आहे.
शनिवारी (ता. २९) सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अक्षय रमेश धाडे (वय २८, रा. रावेत, पुणे) आणि हर्षप्रीत हरप्रितसिंग बांबा (रा. पुणे, मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश), असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. स्वप्नील परशुराम शिंदे (वय २८, रा. तुकाईनगर-हडपसर, पुणे) हा बेपत्ता आहे. तर, त्यांच्यासोबत असलेला संकेत विरेश जोशी (वय २६, रा. बाणेर, पुणे) हा जखमी झाला आहे. पुण्यात आयटी कंपनीमध्ये काम करणारे चौघेजण शनिवारी सकाळी मारुती बलेनो मोटारीने (क्र. एम.एच. १२ एच.डी. ३९८४) भोर परिसरात फिरण्यासाठी आले होते.
वरंधा घाटात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असूनही सकाळी ते भोर-निगुडघर मार्गे वरंधा घाटत गेले. साडेआठच्या सुमारास वारवंड आणि शिरगाव या गावांच्या दरम्यान वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार सुमारे अडीचशे फूट खोल नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कोसळली. त्यावेळी संकेत जोशी हा मोटारीबाहेर फेकला गेल्याने वाचला. परंतु, इतर तिघे पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुपारी एकच्या सुमारास मोटारीतील अक्षय धाडे आणि हर्षप्रीत यांचे मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. परंतु, स्वप्नील याचा शोध लागला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होता.