• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ठाकरे शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक, उद्धव ठाकरेंनी खासदारांना काय सांगितलं?

ByEditor

Mar 1, 2025

मुंबई : राज्यात 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार असल्यानं विरोधी पक्षनेते पदावर ठाकरेंच्या सेनेकडून दावा करण्यात येत आहे. यामध्ये तीन जणांची नावं समोर येत आहेत. यावर ठाकरे शिवसेनेच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या सेनेमधील अनेकजण पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत अन्य पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळं जे डॅमेज कंट्रोल होतंय त्याबाबत आणि राज्यातील अधिवेशन, केंद्रीय अर्थसंकल्पीय दुसऱ्या टप्पातील अधिवेशनात कोणत्या रणनीतीनं काम करायचं, कशाप्रकारे काम केलं पाहिजे, याबाबत आज मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी खासदारांसोबत संवाद साधला.

पक्ष बांधणीसाठी संघटनात्मक काम करा : बैठकीला खासदार अरविंद सावंत हे मुंबईच्या बाहेर असल्यानं अनुपस्थित होते. तर खासदार संजय राऊत हे नाशिकला असल्यामुळं बैठकीला हजर राहू शकले नाहीत. जे लोक पक्ष सोडून जात आहेत. त्याची कारणे काय? त्यांना थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? याच्यावर खासदारांच्या बैठकीत मंथन झालं. तसंच माझ्याकडून आणि आदित्य ठाकरेंकडून तुम्हाला कशा प्रकारची मदत हवी आहे? आमच्याकडून काय अपेक्षा आहे? हे आम्हाला सांगा, असं उद्धव ठाकरेंनी खासदारांना विचारलं पक्ष स्थापन झाल्यापासून पक्षात लोक येतात आणि जातात. पण नवीन येणाऱ्या लोकांना कोणती जबाबदारी द्यायची? आगामी काळात पक्ष बांधणीसाठी संघटनात्मक काम कसं करायचं? संघटना वाढवण्यासाठी आमदार, खासदार, पदाधिकारी, शाखाप्रमुख यांनी कशाप्रकारे काम केलं पाहिजे, याबाबत उद्धव ठाकरे यांनी खासदारांशी संवाद साधला, अशी माहिती खासदार संजय दिना पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

राज्यातील जे प्रश्न आहेत, ते प्रश्न आमदारांनी अधिवेशनाच्या काळात सभागृहात मांडले पाहिजेत. खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडले पाहिजेत. एकत्रितरित्या खासदारांनी कसं काम केलं पाहिजं, याबाबत उद्धव ठाकरे यांनी खासदारांसोबत चर्चा केली. तसंच पुढील काळात राज्यभर सभा, मेळावे इतर कार्यक्रम होणार आहेत. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात 9 मार्च रोजी मेळावा होणार आहे. या मेळाव्याचं उद्घाटन आमदार आदित्य ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं पक्षबांधणी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी कामाला लागले पाहिजे. लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. सत्ता असते तिकडे लोकं सोडून जातात. पण तुम्ही कठीण काळातही आमच्यासोबत आहात. शिवसेना स्थापन झाल्यापासून लोक सोडून जातात. नवीन लोक येत आहेत. त्यामुळं एकजुटीनं सर्वांनी कामाला लागलं पाहिजे. पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला पाहिजे. यासाठी खासदार, आमदार आणि माजी नगरसेवकांनी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, असा मेसेज यावेळी खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी दिला, असंही खासदार पाटील यांनी सांगितलं.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!