मुंबई : अबु आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना अधिवेशन काळात निलंबन करावे, असा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अबु आझमी यांचे फक्त निलंबन करून चालणार नाही, तर त्यांचे सदस्य रद्द करा, अशी सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केली.
अबू आझमी यांच्या अधिवेशनातील निलंबनाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांचा सभागृहात गदारोळ झाला. दोन्ही बाजूकडील आमदारांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रशांत कोरटकर यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी विरोधकांची मागणी केली. विधानसभा सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांच्या जवळ आमदार एकत्र येत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडलं आहे.
अबू आझमी काय म्हणालेले?
औरंगजेब एक महान राजा होता. त्याच्या काळात भारतात सुवर्णकाळ होता, असे विधान अबू आझमी यांनी केलं होतं. औरंगजेबाची कबर खोदण्याबद्दल बोलणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत. मुस्लिमांवर अत्याचार केले जात असल्याचेही ते म्हणाले होते.