खरं तर उशीरच झाला…अविश्वास प्रस्तावावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अडचणीत आणण्यासाठी महाविकास विकास आघाडीने बुधवारी मोठे पाऊल उचलले. आघाडीने गोऱ्हे यांच्याविरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नीलम गोऱ्हे या आजारी असल्याने विधीमंडळात उपस्थित राहू शकलेल्या नाहीत. त्या गुरूवारी उपस्थित राहून कामकाजात सहभागी होणार आहेत. त्याआधीच विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हा ठराव विधिमंडळ सचिवांकडे दाखल करण्यात आला आहे. नीलम गोऱ्हे या उपसभापती झाल्या तेव्हा शिवसेना एकत्रित होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर काही दिवसांनी त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेने यापूर्वीच दाखल केली होती. त्यावर विधिमंडळात चर्चाही झाली होती. याच अनुषंगाने हा ठराव आहे का, याबाबत स्पष्टता नाही.
त्याचप्रमाणे दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात गोऱ्हे यांनी ठाकरेंवर टीका करताना मर्सिडीजचा उल्लेख केला होता. त्यावरून बराच राजकीय वाद निर्माण झाला होता. याअनुषंगाने हा ठराव दाखल करण्यात आला आहे का, याबाबतही माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे हा ठराव नेमका का दाखल करण्यात आला, याबाबत अस्पष्टता आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ठरावावर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, महाविकास आघाडीने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. हा प्रस्ताव आणायला आमच्याकडून खरा उशीरचं झाला. आतापर्यंत त्या निलंबित व्हायला हव्या होत्या. कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर या अधिवेशनातच चर्चा होणे अपेक्षित आहे. अविश्वास प्रस्ताव ज्या कारणासाठी आणलाय, ती कारणे तुमच्यासमोर येतील, पण पक्षांतर हाही एक मुद्दा आहे. यापूर्वीच हा ठराव आणून मंजूर व्हायला हवा होता, असेही ठाकरे म्हणाले.