• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गरज असेल तरच बाहेर पडा! मुंबई, कोकणात राहणाऱ्यांना इशारा

ByEditor

Mar 8, 2025

मुंबई : मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये 9, 10 आणि 11 मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, असं सांगितलं आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा, तर दक्षिण कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटा येतील, असेही त्यांनी इशारा देताना नमूद केलं आहे.

मुंबईचे कमाल तापमान शुक्रवारी (7 मार्च रोजी) 35.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. येत्या बुधवारपर्यंत म्हणजेच उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर यात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 12 मार्चपर्यंत मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये 40 अंश तापमान नोंदविले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो, असा अंदाज आहे.

कोकणात उष्णतेची लाट म्हणजे दिवसाचे कमाल तापमान 37 अंशांपेक्षा अधिक नोंदविले जाईल.ते त्या दिवसाच्या सरासरी तापमानापेक्षा 4 अंशांनी जास्त असेल. कोकण विभागात चालू आठवड्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचे चटके जाणवत असून पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत हे वातावरण कायम असण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळेच गरज असेल तरच दिवसा बाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान आणि आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. याचा परिणाम कोकणातील वातावरणावर झाला असून रविवार, सोमवार आणि मंगळवारी दक्षिण आणि उत्तर कोकण विभागातही तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवू शकते. कोकण विभागात फेब्रुवारीमध्ये उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले असताना हीच परिस्थिती आता मार्चच्या सुरुवातीपासून अनुभवायला लागत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!