• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भाजपने पुन्हा निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं?, विधानपरिषदेच्या 3 जागांसाठी ‘या’ उमेदवारांची घोषणा

ByEditor

Mar 16, 2025

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. महायुती सरकारमध्ये या पाच पैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला आलेल्या आहेत. या तीन जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. घोषित झालेल्या नावांमध्ये माधव भंडारी यांचे नाव नसल्याने पुन्हा एकदा भाजपने निष्ठावान कार्यकर्त्याला डावलले का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

भाजपकडून आज रविवारी सकाळी विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. या तिन्ही नेत्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते माधव भंडारी यांची संधी पुन्हा एकदा हुकली आहे. भाजपकडून विधानपरिषद उमेदवारांच्या दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत माधव भंडारी आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जात होते. परंतु, अंतिम यादीत त्यांची नावे डावलली गेली आहेत.

माधव भंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि संघ परिवारात निष्ठेने काम करत आहेत. 2014 साली सत्ता आल्यापासून माधव भंडारी यांना एकदाही महत्त्वाचे पद मिळाले नव्हते. राज्यात विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणूक आल्यानंतर प्रत्येकवेळी माधव भंडारी यांना संधी मिळणार, अशी चर्चा होते. मात्र, प्रत्यक्षात माधव भंडारी हे उमेदवारीपासून वंचित राहतात. आतादेखील त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे भाजप आणि संघ परिवरातील जुन्या-जाणत्यांच्या वर्तुळात याचे काय पडसाद उमटणार हे पाहावे लागेल.

विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून तीन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

27 तारखेला मतदान व मतमोजणी

20 मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 27 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत निवडणूक होईल. त्यानंतर सायंकाळी 5 वा. लगेचच मतमोजणीला सुरुवात होऊन रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर होतील.

कोण आहेत दादाराव केचे?

आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांचे नाव भाजपकडून विधानपरिषद करिता आज जाहीर करण्यात आले. केचे यांची विधानसभेत उमेदवारी कापून सुमित वानखेडे यांना देण्यात आली होती. त्यामुळे केचे नाराज होते. उमेदवारी नाकारल्यामुळे केचे बंडाच्या तयारीत होते. आर्वी मतदारसंघातून तिकीट नाकारलेल्या दादाराव केचे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यास नक्की संधी देणार असे सांगण्यात आले होते. आता त्यांना संधी देण्यात आली आहे.

संजय केनेकर यांचा राजकीय प्रवास कसा राहिला?

संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. 2021 मध्ये पोटनिवडणुकीत संजसय केनेकर यांना संधी देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्यांना आमदार होता आले नाही. यानंतर आता 4 वर्षांने त्यांना संधी देण्यात आली आहे. तर संदीप जोशी हे नागपूरमधून येतात. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

कोण आहेत संदीप जोशी, ज्यांना मिळाली संधी?

संदीप जोशी नागपूर महापालिकेतील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक राहिले आहेत. चार वेळा नागपूर महापालिकेत नगरसेवकपद भूषविले. संदीप जोशी हे लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपकडून रिंगणात उतरले, मात्र काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांच्याकडून पराभव झाला .

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!