सलीम शेख
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून माणगाव शहरातील तीन बत्ती नाक्यावर कंटेनरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अपघाताबाबत सविस्तर वृत्त असे की, माणगावमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर जुने माणगांव येथील तीन बत्ती नाका येथे दि. २० मार्च रोजी सकाळी ११:१५ च्या दरम्यान महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा कंटेनर क्र. आरजे १९ जीजी ०५७० ह्या कंटेनरच्या मागच्या टायरखाली येऊन जुने माणगांव येथील राहणारा मोहम्मद रफी इस्माईल जामदार (वय ३९) हा तरुण आपल्या ताब्यातील हिरो होंडा पॅशन प्लस मोटारसायकल (क्र. एमएच ०५ वाय ४४८२) घेवुन जात असताना तीन बत्ती नाका येथे कंटेनरच्या मागील टायर खाली आल्याने मोहम्मद रफी इस्माईल जामदार याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मोहम्मद रफी इस्माईल जामदार हा जुने माणगांव येथील रहिवासी असून व्यवसायाने इलेक्ट्रिशन प्लबिंग, एसी फ्रीज मेकॅनिक म्हणून कार्यरत होता. तसेच जामदार हा “आपदा मित्र” म्हणून माणगावमध्ये साळुंखे रेस्क्यू टीममध्ये देखील कार्यरत होता. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
माणगावमध्ये सततची वाहतूक कोंडी होत असते. माणगाव बायपासचे काम रखडले आहे. होळी सणासाठी कोकणात चाकरमानी येत असतात. माणगाव शहरात होळी सणापासून दररोज वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवित असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडते. या अपघातानंतर संतप्त जमावाने आक्रमक भूमिका घेत मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी माणगाव पोलीस ठाणे टीम, माणगाव वाहतूक पोलीस शाखा, महामार्ग पोलीस तातडीने दाखल झाले. त्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
