रायगड: महाड मतदारसंघातून भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या स्नेहल जगताप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्ह दिसत आहेत. दुसरीकडे भरत गोगावले यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणी सुरू केल्याने, गोगावले यांच्यासह शिवसेना शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे.
काँग्रेस मध्ये असलेल्या स्नेहल जगताप यांनी दोन वर्षापूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटाकडून त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र भरत गोगावले यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र या निवडणूकीत ९१ हजार २३२ मतें मिळाली होती. आता मात्र त्या शिवसेना ठाकरे गटाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी बुधवारी मुंबईत पक्षप्रवेश केला. स्नेहल जगताप गेले काही महिने भाजपच्या संपर्कात होत्या. मात्र भाजपमध्ये पक्षप्रवेशाबाबत निर्णय होत नसल्याने त्यांनी तडकाफडकी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
दक्षिण रायगडात शिवसेना ठाकरे गटाचे अस्तित्व स्नेहल जगताप यांच्यामुळे टिकून होते. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील पक्षप्रवेशामुळे दक्षिण रायगड मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अस्तित्व अडचणीत आले आहे. रत्नागिरीत राजन साळवी, सुरेश बने, संजय कदम यांनी पक्षत्याग केल्याने आधीच कोकणात ठाकरे गटाची मोठी वाताहत झाली होती. आता रायगड मध्येही स्नेहल जगताप यांनी अडचणीच्या काळात साथ सोडल्याने कोकणात ठाकरे गटाची कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
स्नेहल जगताप या काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर पक्षाची संघटना मतदारसंघात टिकवून ठेवण्यात स्नेहल जगताप यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. महाड नगर परिषदेच्या तरुण तडफदार नगराध्यक्षा म्हणून त्यांनी स्वताची ओळख निर्माण केली होती. पक्षांतर्गत त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकमिटीच्या सचिव म्हणून काम पाहिले होते. २०२२ मध्ये त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. महाड मधून २०२४ मध्ये निवडणूकही लढवली होती.