मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून रमजान ईदानिमित्त 35 ते 36 लाख मुस्लिम कुटुंबियांना ‘सौगात ए मोदी’ योजनेअंतर्गत भेटवस्तू वाटप करणार आहे. भाजपकडून ही योजना जाहीर होताच काँग्रेससह विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर टीका करत आहे. तर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या योजनेवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल करत ही योजना ‘सौगात ए मोदी’ नसून ‘सौगात ए सत्ता’ आहे अशी टीका केली आहे. उद्धव ठाकरे आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा देणारे आता ‘सौगात’ वाटणार असा टोला या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला लावला. तसेच ज्या धर्मामध्ये तुम्ही विष पेरले त्यांच्याच घरी जाऊन आता तुम्ही भेटवस्तू देणार असं देखील यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच निवडणुकीत मुस्लिम आम्हाला मत देत आहे म्हणून ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल असं भाजपकडून सांगण्यात येत होते मात्र तुम्ही सौगात देत आहे तर तुम्ही देखील हिंदुत्व सोडले का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
या पत्रकार परिषदे पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्याकडे जे उड्डाणटप्पू ज्याचा उल्लेख अनिल परब यांनी विधानपरिषदेमध्ये बोलताना केला होता ते आता टोपी घालून सौगात कशी वाटणार हे आम्हाला बघायचा आहे असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मंत्री नितेश राणे यांना लावला. तर आमची शिवसेना खरी शिवसेना असून त्यांची गद्दार सेना आहे. असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांचा माज दिसला. हे अधिवेशन सरकारचे अपयश लपवणारे अधिवेशन होते, निरर्थक अधिवेशन होते. या सरकारचा 100 दिवसांचा संकल्प होता मात्र सरकारला एकही ठोस उपयोजना करत्या आल्या नाही अशी देखील टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली.