मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि शिवसेना शिकवू नये. भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना मिशा फुटला नव्हत्या, तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पिळ देत फिरतोय या देशात. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व अजिबात शिकवू नये. किंबहुना वक्फ सुधारक बील आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. वक्फ बील संदर्भात जे बील आले आहे त्यात सरकार काही बदल करू पाहत आहे. मात्र त्या बिलाला देशातील फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे या बिलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) ही पूर्णपणे पाठिंबा नाही.
ज्याप्रमाणे राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या भूमिकेबाबत आरएसएसने जी भूमिका घेतली तशीच भूमिका घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या बिलाला विरोध दर्शवला आहे. उगाचच वातावरण खराब करू नका. अशी भूमिका संघाची आहे. मात्र हिंदुत्वाचा आणि या बिलाचा मेळ जर का कोणी घालू पाहत असेल तर तो पूर्णपणे मूर्खपणा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. वक्फ सुधारणा विधेयक संदर्भात बोलत असताना त्यांनी हे भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध काय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगू शकतील. ज्याप्रमाणे इतर सुधारणा बिल असतात त्याचप्रमाणे हे विधेयक आहे. या बिलाचा संबंध भविष्यात काही उद्योगपतींना या जमिनीवर कब्जा मिळावा त्यासाठी या बिलाचा स्पष्ट हेतू आहे. शिवसेना ही प्रोग्रेसिव्ह हिंदुत्ववादाचा विचार मांडणारी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कायम विज्ञानवादी विचार मांडला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बगलबच्चे जी बांग देत आहेत तो निव्वळ मूर्खपणा आहे. अशी टीकाही खासदार संजय राऊत यांनी. हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि हे विधायक आपल्या जागी. असेही ते म्हणाले आहे.
आमची भूमिका ठरली आहे. ती आम्ही शेवटी कळवू -संजय राऊत
विरोधी पक्षात असताना आम्ही भारतीय जनता पक्षाने आणलेल्या 370 कलमेच्या विधेयकाला पाठिंबा दिला होताच ना. कारण तो विषय राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय सुरक्षा आणि हिंदुत्वाच्या समर्थनार्थ होता. आम्ही तिहेरी तलाक च्या विषयालाही विरोध केला नाही. मात्र आज वक्फ बीलचा संबंध लाखो गरीब मुस्लिमांच्या जमिनीसंदर्भातला आहे. कालांतराने त्याच्यामध्ये काहीतरी घुसवून त्या जमिनी आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का, त्यासाठी ही पायाभरणी सुरू आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. या विधेयकाबद्दल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा केली. आमची भूमिका ठरली आहे. ती आम्ही शेवटी ठरवू असेही खासदार संजय राऊत म्हणाले.