शेकापचे म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू
अमुलकुमार जैन
रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रात आज सकाळी दोन भावांसह एका नातेवाईकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत तरुणांची नावे मयुरेश पाटील (23), हिमांशू पाटील (21) व अवधूत पाटील (26) अशी आहेत.
शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस, रायगड जिल्हा बँकेचे संचालक तथा म्हसळा तालुक्याचे हिंदु समाज उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्यावर शनिवारी दुःखाचा डोंगर कोसळला. पोहायला गेलेल्या आपल्या दोन मुलांसह नातेवाईकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. पोटच्या मुलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळलं आहे. हि बातमी ऐकुन कुटूंबासह नातेवाईकांनाही धक्का बसला. ही बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. नेमके काय झाले, हे ही अनेकांना माहित नव्हते. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. या आघाताने कुटुंब, नातेवाईक आणि गावावर शोककळा पसरली आहे.
अत्यंत सुरक्षित आणि पर्यटकाना आवडणाऱ्या वेळास, ता. श्रीवर्धन या बीचवर पोहून येतो असे सांगत म्हसळा शेकापक्षाचे तालुका चिटणीस संतोष पाटील यांचा विवाहीत मुलगा अवधूत संतोष पाटील (वय २६) आणि मयुरेश संतोष पाटील (वय २३, दोघेही रा. गोंडघर) हे दोघे आणि त्यांचा ऐरोली मुंबईवरून कालच आलेला मित्र हिमांशू पाटील (वय २९) हे तिघेही आज सकाळी वेळास बीचवर पोहून येतो असे आई वडीलाना सांगून सुमुद्रावर गेले. मात्र तिघांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना सकाळी १०.३०च्या दरम्यान घडल्याचे दिघी सागरी पोलिसांनी माहिती देताना सांगितले. १२ वाजण्याच्या दरम्यान ते मुंबईला जाणार होते. म्हणून अवधूत आणि मयुरेश हे दोघेही समुद्रातून बाहेर आले गाडीत बसले मित्र हिमांशू अद्याप का आला नाही हे पाहाण्यास दोघेही भाऊ गेले असताना हिमांशू समुद्रात बुडताना दिसला म्हणून दोन्ही भावांनी तात्काळ समुद्रात उड्या घेऊन जिवलग मित्र हिमांशूला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र तिघांचाही दुर्देवी मृत्यू झाला.
अत्यंत सुरक्षित आणि पर्यटकांना आवडणारा वेळास हा बीच सर्वांत सुरक्षित असून घडलेला प्रसंग हा आमचे गावाला व गोंडघर येथील संतोष पाटील यांच्यासाठी दुर्दैवी असल्याचे पत्रकार शिलकर यांनी सांगितले. दिघी सागरी पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ, वॉटर स्पोर्ट्स मालक वसीम फगजी यांचे मदतीने तीनही मृतदेह तात्काळ बाहेर काढले आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.
