सलीम शेख
माणगाव : भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती इको गाडीची अँक्टिव्हा दुचाकी गाडीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू होऊन चालकासह दोन जण जखमी होऊन दुचाकीचे नुकसान झाले. सदरील अपघाताचा गुन्हा मंगळवार दि. ६ मे २०२५ रोजी रात्री ८ :३० वा. माणगाव तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत हॉटेल कोकण सम्राटच्या जवळ मुंबई-गोवा महामार्गावर मुगवली फाट्याजवळ घडला. या अपघाताची फिर्याद दुचाकी चालक वैभव सुभाष भोजने (वय-२५) रा. देवळी कोंड ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, यांतील एक राखाडी रंगाची मारुती इको गाडी (क्रमांक माहिती नाही) यावरील अनोळखी चालकाने त्याच्या ताब्यातील इको गाडी गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे अतिवेगात चालवीत घेऊन येत असताना अपघात ठिकाणी आल्यावर समोरून येणाऱ्या होंडा अँक्टिव्हा दुचाकी (क्र.एम.एच.०६ सी.आर.५९२३) या गाडीवरील चालक उजव्या बाजूचा इंडिकेटर देऊन उजव्या बाजूला वळत असताना इको गाडीचा चालक आरोपी याने अँक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सलोनी संजय भोसले (वय -१८) रा. देवळी कोंड ता. माणगाव या तरुणीचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक वैभव सुभाष भोजने (वय-२५) व जान्हवी संतोष उंडरे (वय -१८) दोन्ही रा. देवळी कोंड ता. माणगाव हे दोघे जखमी झाले.
या अपघाताची माहिती समजताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे व पोलीस उपनिरीक्षक श्री. काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गुन्हा रजि.नं.१५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१ ),२८१,१२५ (अ),१२५ (ब),मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ प्रमाणे दाखल करण्यात अली आहे. सदर अपघाताचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. काळे हे करीत आहेत.