मुंबईपर्यंतचा प्रवास खिळखिळ्या झालेल्या एसटीतून
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील एसटी महामंडळाच्या दुर्लक्षित कारभारामुळे आता आगाराला नादुरुस्त गाड्यांचे ग्रहण लागले आहे. दोन महिन्यामध्ये खराब बसेस प्रवासात बंद पडल्याच्या चार घटना घडत असताना बुधवारी खिळखिळी झालेली बस मुंबईसाठी सोडण्यात आल्याने प्रवाशांत संताप व्यक्त केला जात आहे.
सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. या आगारात खिळखिळ्या बनलेल्या वाहनांकडे महामंडळाच्या दुर्लक्षाची भर पडली आहे. बुधवारी बोर्लीपंचतन येथून सकाळी पावणे सात वाजता श्रीवर्धन – मुंबई जाणाऱ्या एम.एच. २० बी एल १६६२ या क्रमांकाच्या बसचे बॉडी सुटलेली पूर्ण गाडी खिळखिळी झालेली फुल रिझर्व्हेशन व उभ्या प्रवाशांना घेऊन मुंबई सोडण्यात आली. आशा बसमध्ये सुखकर प्रवास कसा होणार प्रवाशांनी विचारत संताप व्यक्त केला.

रस्त्यात मध्येच बस बंद पडण्याचा प्रसंग अनेकवेळा समोर आला आहे. कधी सेंटर बोल्ट तुटल्याने गाडी बंद पडली, तर काही वेळा एसटीच्या मागील चाकाचे नट बोल्ट निघाल्याने गाडी जागेवरच थांबली. अशा घटना ग्रामीण भागात धावणाऱ्या गाड्यांमध्ये घडत असतात. मात्र, त्याच अवस्थेत खेड्यापाड्यातील चालणारी एसटी बुधवारी मुंबईस सोडण्यात आली. मोठ्या संख्येने प्रवासी असताना देखील एसटीच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने आता श्रीवर्धन आगाराचा प्रवास रामभरोसे असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून उमटत आहेत.
श्रीवर्धन आगारात कंत्राट पद्धतीत असणाऱ्या बस ब्रेकडाऊन आहेत. त्यामूळे आगाराची एसटी सोडण्यात आली.
-महेबुब मनेर,
आगारप्रमुख, श्रीवर्धन.
सर्व बाजूंनी फाटलेली व खिळखिळी झालेल्या बसमधून मुंबई प्रवास करण्याची वेळ आम्हा श्रीवर्धनवासियांवर येत आहे.
-नंदकिशोर भाटकर,
प्रवासी.