मुरुड : कोकणातील रायगड जिल्ह्यातला जलदुर्ग असलेला मुरूडचा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सोमवारी ३० मे पासून पुढे तीन महिने बंद ठेवला जाणार आहे. आगामी पावसाळ्याचे दिवस व समुद्राच्या लाटांचा पाण्याचा बदललेला वेग यामुळे या किल्ल्यावर पोहोचणे धोक्याचे ठरू शकते. यामुळे हा किल्ला पावसाळ्यात पाहण्यासाठी बंद ठेवला जातो. हा किल्ला सोमवारी ३० मे पासून बंद राहणार असून तीन महिन्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात हा जलदुर्ग पाहण्यासाठी पर्यटकांना खुला होईल. रायगड जिल्हा प्रशासनाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
२६ मे पासून हा किल्ला बंद ठेवला जाणार होता पण शनिवार रविवार सुट्टी आल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी हा किल्ला पाहण्यासाठी झाली होती त्यामुळे बाहेरूनच या किल्ल्याचे दर्शन घेऊन समाधान मानत अनेकांना परत फिरावे लागले. जलदुर्ग असलेल्या जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी केवळ शिडाच्या होड्याच पायरी पर्यंत जातात.
पावसाच्या तोंडावर दरवर्षी समुद्र प्रवाह वेग घेतो. समुद्राच्या पाण्याचा बदललेला प्रचंड वेग यामुळे किल्ल्यावर पोहोचणे अशक्य व धोकादायक होते. पावसाळा जवळ आला की लाटांचा प्रवाहाचा वेग वाढतो त्यामुळे शिडाच्या बोटी हेलकावे घेतात. त्यामुळेच प्रशासनाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून दरवर्षी पावसाळ्यात हा किल्ला पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बंद ठेवण्यात येतो.