• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना काळाचा घाला; जगबुडी नदीत कार कोसळून 5 जणांचा मृत्यू

ByEditor

May 19, 2025

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडजवळ भरधाव कार जगबुडी नदीच्या पुलावरून खाली कोसळली. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. कार १०० फुटांवरून नदीत कोसळली. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला तर चालकासह दोघे जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामधील सर्व मृत आणि जखमी हे मुंबईत राहणारे आहेत. मृतांमध्ये मेधा परमेश पराडकर , सौरभ परमेश पराडकर (22), मिताली विवेक मोरे (45) , निहार विवेक मोरे (19) , श्रेयस राजेंद्र सावंत (23) यांचा समावेश आहे. तर गाडीचा चालक आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर कळंबणी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मिरारोड येथे राहणारे काही जण वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कोकणातील देवरुख येथे जात होते. पहाटेच्या दरम्यान हे सर्वजण खेड येथे पोहचले. खेडमधील जगबुडी पुलावर चालकाला अंदाज न आल्याने कार नदीपात्रात कोसळली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये वडीलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या त्यांच्या मुलीचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच देवरूख गावावर शोककळा पसरली.

विवेक श्रीराम मोरे, मिताली विवेक मोरे, निहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत (भाचा), परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर हे सर्वजण कारमधून प्रवास करत होते. मिताली मोरे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या आपले कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत माहेरी जात होत्या. या अपघातामध्ये मेधा पराडकर, सौरभ पराडकर, मिताली मोरे, निहार मोरे, श्रेयस सावंत या ५ जणांचा मृत्यू झाला. पराडकर कुटुंब नालासोपारा येथे राहत होते. तर मोरे कुटुंबीय मिरा-भाईंदरमध्ये राहत होते.

मिताली मोरे यांच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त कळातच त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक हे सर्वजण रात्री साडेअकराच्या सुमारास कारने देवरूख या गावी अंत्यसंस्कारासाठी जायला निघाले. मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे जगबुडी नदी पुलावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार थेट १०० फुटांवरून नदीत कोसळली. अपघाताची ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह बाहेर काढले आणि गंभीर जखमी झालेल्या परमेश पराडकर आणि विवेक मोरे यांना कळंबणी येथील रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!