बोंडशेत, चांदेवाडी हद्दीत ४ गुरांचा मृत्यू
सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चांदेवाडी व बोंडशेत गावच्या मध्यात बुधवार, दि. २१ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह झालेल्या वादळं पावसामुळे कांदळगाव ते कोलाड अशी जाणारी महावितरणची उच्चदाब वाहिनी कंडक्टर तुटून विद्युत प्रवाहित लाईन माळरानावर पडल्याने चरणाऱ्या चार गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चांदेवाडी गावचे शेतकरी महादेव सोनू आंबेकर यांचे शेतीकामाचे दोन बैल तसेच चांदेवाडी गावाचे ग्रामस्थ अनंत पांडुरंग शिगवण यांची गाभण गाय व बोंडशेत गावचे शेतकरी दिपक गोविंद चव्हाण यांची गाभण गाय अशा जनावरांचा समावेश आहे.
घटनेची माहिती महावितरणला देताच विदयुत पुरवठा बंद करण्यात आला. २२ मे रोजी घटनास्थळी माणगाव पोलीस, माणगाव महावितरण अधिकारी व कर्मचारी, माणगाव वन अधिकारी व कर्मचारी तसेच भाले सरपंच दत्ताराम खांबे, ग्रामसेवक राहुल ठाकूर, मराठी उद्योजक उपेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते सागर खानविलकर व स्थानिक ग्रामस्थ यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ऐन शेतीच्या कामाच्या वेळी मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. यामध्ये महावितरणचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याचा आरोप चांदेवाडी व बोंडशेत गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच ह्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि योग्य मदत महावितरण कंपनी व शासनाकडून मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी भाले सरपंच खांबे, सामाजिक कार्यकर्ते सागर खानविलकर व उपेंद्र जाधव तसेच स्थानिक ग्रामस्थ संतोष जागडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
घटनास्थळी महावितरणचे सहायक अभियंता एस. बी. सोननीस यांनी पंचनामा केला आहे. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आम्ही पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहोत संबंधित निर्णय कंपनी प्रशासन घेईल.