अनंत नारंगीकर
उरण : पावसाळी मासेमारी बंदीच्या १५ दिवस अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे. ३१ मे पासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार होता. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस आणि जोरदार वार्यांमुळे समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने २१ मे ते २४ मेपर्यंत मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ३० मेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ७० टक्के मच्छीमार नौका करंजा, मोरा, दिघोडे, केळवणे बंदरांमध्ये स्थिरावल्या आहेत. त्यामुळे मासळी बाजारात समुद्रातील मासे मिळणे कठीण झाले असून माशांचे भाव गगनाला भिडले आहेत.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभला आहे. सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडील सन २०२३-२५ नोंदीनुसार उरण तालुक्यात सुमारे १ हजार सागरी मासेमारी नौका आहेत. यात काही यांत्रिकी नौका आहेत. या सर्व नौका सतर्कतेच्या इशार्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जात नाहीत. अरबी समुद्रात २१ ते २४ मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होऊन समुद्र खवळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना सावधगिरी बाळण्याचे आवाहन मत्स्य विभागाकडून करण्यात आले आहे. ३१ मे पासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार होता. मात्र अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाळी मासेमारी बंदीच्या १५ दिवस अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे. याचा फटका हा मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांना बसला आहे. त्यात मासळी बाजारात समुद्रातील मासे मिळणे कठीण झाल्याने खवय्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी जावू नये, लहान बोटींचा वापर टाळावा, सुरक्षेची आवश्यक साधने जवळ बाळगावी, वार्याचा वेग आणि लाटांचा जोर लक्षात घेवून सर्व नौका आणि होड्या सुरक्षितस्थळी उभ्या कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
पावसाळी मासेमारी बंदी ३१ मे च्या मध्यरात्रीपासून सुरु होणार होती. परंतु तत्पूर्वीच बदललेल्या धोकादायक वातावरणामुळे मच्छीमारांना धोक्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे २१ मे पासूनच मासेमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी जाणे थांबले आहे.परंतु शासनाच्या नियमांचे पालन न करता करंजा बंदरात मोठ्या प्रमाणात बंदी कालावधीतही मासेमारीचा व्यवसाय केला जात आहे. यावर्षी बंदी कालावधीत कोणी मासेमारीसाठी समुद्रात गेला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
-सुरेश बाबूलगावे
परवाना अधिकारी, मत्स्यव्यवसाय विभाग उरण.