किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था ही सर्वांसाठी लाजिरवाणी बाब -खा. सुनील तटकरे
४८ तासात ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
मिलिंद माने
महाड : छत्रपती शिवरायांची स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था होणे ही तुमच्या आमच्यासाठी लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी किल्ले रायगड रस्त्याच्या कामांबाबतच्या ग्रामस्थांच्या व्यथा ऐकून दिली आहे.
किल्ले रायगड रस्त्याच्या कामाच्या दिरंगाई व लाडवली पुलाच्या अर्धवट कामामुळे रायगड विभागातील व प्रामुख्याने लाडवली येथील ग्रामस्थ शुक्रवार, २३ मे २०२५ रोजी आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. ग्रामस्थांनी किल्ले रायगड येथून महाडच्या दिशेने येत असलेल्या खासदार सुनील तटकरे यांचा ताफा अडवला आणि आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यासमवेत नुकत्याच राष्ट्रवादीत दाखल झालेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, हनुमंत जगताप, धनंजय देशमुख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
लाडवली ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांचा ताफा थांबवून किल्ले रायगड रस्त्याच्या कामाबाबत असलेल्या विविध समस्या व तक्रारींचा पाढा वाचला. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत व संबंधित ठेकेदाराकडून लाडवली पुलाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाच्या पूर्ततेसाठी १५ मे २०२५ ही तारीख देण्यात आली होती. परंतु, दिलेली तारीख उलटूनही या पुलावर अजूनही काँक्रिटीकरण झाले नसल्याने सध्या मान्सूनपूर्व झालेल्या पावसात पुलावर जागोजागी गुडघाभर पाण्यातून वाहने मार्गक्रमण करीत असल्याचे ग्रामस्थांनी खासदार तटकरेंच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रकल्प अधिकारी अक्षरा ढालके, कनिष्ठ अभियंता झेंडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते. यावेळी म्हाप्रळ पंढरपूर या रस्त्याच्या कामाची देखील अशीच दुरवस्था असल्याचे आणि ठेकेदार कंपनी देखील एकच असल्याचे ग्रामस्थांनी तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आणि ग्रामस्थांचा कंपनी व ठेकेदाराविरोधात असलेला रोष लक्षात घेऊन सदर ठेकेदाराला किल्ले रायगड व म्हाप्रळ पंढरपूर या दोन्ही रस्त्याच्या कामाच्या दिरंगाईबाबत दर दिवशी दहा ते पंधरा हजाराचा दंड ठोठावण्याची कारवाई तातडीने करण्याचे निर्देश दिले.
दिलेले निर्देश व सूचना या तातडीने अंमलात आणल्या गेल्या नाहीत तर येत्या मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या कामांची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी खरमरीत पत्रव्यवहार करू असा इशारा देखील त्यांनी अधिकाऱ्यांना यानिमित्ताने दिला.
या प्रकल्पासाठी काम करणारे कनिष्ठ अभियंता झेंडे यांच्याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड चीड व संताप यावेळी दिसून आला. आपली जबाबदारी झेंडे यांनी चोख पार पाडली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून त्यांची या प्रकल्पातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी तटकरे यांच्याकडे केली.
याबाबत तटकरे यांनी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना झेंडे यांना या प्रकल्पातून हटविण्यात यावे अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे ग्रामस्थांचा आपल्याबाबत असलेला रोष व अविश्वास अधिक प्रमाणात वाढला असताना आपण या पदावर काम करू नये अशा पद्धतीचे आवाहन देखील खासदार तटकरे यांनी झेंडे यांना सर्वांच्या उपस्थितीत केले. पुढील ४८ तासात पावसाचा अंदाज पाहून ग्रामस्थांच्या या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात अशा स्पष्ट सूचना व निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.