• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन-बोर्लीपंचतन मार्ग बंद

ByEditor

May 26, 2025

दिवेआगर-भरडखोल मार्गावरील पुल पाण्याखाली; दिवेआगरमध्ये पाणी घुसण्याची भीती

संततधार पावसामुळे शेती व व्यवहार ठप्प

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गावरील नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाला दिरंगाई झाल्याने दिवेआगर गावाजवळील पुल पाण्याखाली गेला आहे. परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अपूर्ण पूल आणि पर्यायी रस्त्यावरील अडथळ्यांमुळे नागरिकांच्या हाल होण्यास सुरुवात झाली आहे.

श्रीवर्धनला जाणारा प्रमुख दिवेआगर–भरडखोल–शेखाडी मार्ग सध्या पूर्णतः बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिवेआगर येथे सुरू असलेल्या कामामुळे मूळ पूल पाडण्यात आला होता. त्याऐवजी नदी मार्गातून तात्पुरता पर्यायी रस्ता बनवण्यात आला होता, मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या नदीमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. संभाव्य अतिवृष्टीमुळे नदीपात्रातील पाणी वाढत आहे. मात्र, हे पाणी पुलाच्या बांधकामामुळे अडत असल्याने दिवेआगर गावात घुसण्याची शक्यता असल्याची भीती येथील ग्रामस्थांना आहे. पावसाचा फटका केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून, शेती आणि बाजारपेठाही याचं गंभीर परिणाम भोगत आहेत.

मे महिन्याच्या अखेरीस पारंपरिक पद्धतीने पेरणीसाठी शेतकरी तयारी करतात. मात्र यंदा मान्सूनपूर्व संततधार पावसामुळे गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यात शेतीची कामे रखडली आहेत. फळबागांमध्ये आंबा, फणस यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या फळांची झाडांवरच गळ व सड होत आहे. अवकाळी पावसामुळे हजारो आंबे अद्याप झडावरती असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळत आहे.

भात खाचरांमध्ये पाणी साचल्याने पेरणीची कामे थांबली आहेत. काही ठिकाणी पेरणीपूर्व तयारीसाठी साठवलेला पालापाचोळा देखील भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले आहे. वातावरणातील गारव्यामुळे पिकांना आवश्यक तितकी ऊष्णता मिळत नसल्याने बागायती पिकांवर वाईट परिणाम होत आहे. पावसामुळे वाहतूक अडथळ्यात आली असून, शेती व फळबागांचे नुकसान होऊन बाजारपेठाही ओस पडली आहे. याचबरोबर पावसामुळे शेतकरी, व्यापारी आणि फळबागधारकांवरही संकट कोसळले आहे. या सर्व परिस्थितीमुळे भरडखोल आणि संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात चिंता व अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे.

भरडखोल मार्गावर बारा गावे असून त्यांना बोर्लीपंचतन शहराकडे दैनंदिन व्यवहारासाठी यावे लागते. मात्र, मार्ग बंद झाल्याने रुग्ण व इतर प्रवासी वर्गाचे हाल झाले आहेत. एक दिवसाच्या पावसाने हाहाकार उडविला आहे. पुढे नियमित पडणाऱ्या पावसापुढे या मार्गाचे काय होणार असा प्रश्न आम्हा गावकऱ्यांना पडला आहे.
-दिनेश चोगले,
माजी सरपंच भरडखोल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!