• Sun. Jun 1st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

हसतमुख निलेशचा ‘खून की आत्महत्या’? न्हावे गावात खळबळ; पोलीस तपासाच्या प्रतिक्षेत गावकरी!

ByEditor

May 30, 2025

घन:श्याम कडू
उरण :
हसतमुख स्वभावाचा, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा न्हावे गावातील निलेश विकास ठाकूर याचा मृत्यू घातपात असल्याचा गंभीर संशय नातेवाईक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी करून या प्रकरणातील ‘खरा सूत्रधार’ गजाआड करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

२६ मे रोजी निलेशचा मृतदेह गावातील स्मशानभूमीत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. रविवारी रात्रीपासूनच तो बेपत्ता होता. मुसळधार पावसात घराबाहेर गेलेल्या निलेशचा दुसऱ्या दिवशी असा मृतदेह सापडल्याने गावात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, निलेशचा कोणाशीही वाद नव्हता. तो नेहमी आनंदी, स्नेही स्वभावाचा होता. मात्र काही मित्रमंडळी त्याच्या आजूबाजूला कायम दिसायची. तरीही या धक्कादायक घटनेबाबत कोणालाही काही कल्पना नाही, हे आणखीनच संशय वाढवणारं आहे.

नातेवाईकांचा ठाम आरोप आहे की, हा आत्महत्येचा प्रकार नसून थेट घातपात आहे. घटनास्थळाची परिस्थितीच संशयास्पद आहे. इतका शांत आणि समजूतदार मुलगा अचानक असं टोकाचं पाऊल का उचलेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. रात्री उशिरा निलेशच्या मोबाईलवर वारंवार येणारे फोन हाही संशयाचा विषय ठरत आहे. या कॉल्सचा तपास लावल्यास प्रकरणातला खरा चेहरा समोर येईल, असं ग्रामस्थांचं ठाम मत आहे.

आता सर्वांची नजर पोलीस यंत्रणेवर!

निलेशच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी, संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी गावातून जोर धरू लागली आहे. हा प्रकार फक्त ‘आत्महत्या’ नसून घातपात असल्याचा संशय या परिसरात व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!