न्हावा शेवाच्या नाकाखाली डिझेल चोरीचा गोरखधंदा
घनःश्याम कडू
उरण : न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरून जाणाऱ्या तेल वाहिन्यांना छिद्र पाडून सरळसरळ इंधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नवी मुंबई क्राईम ब्रँचने केला आहे. सोनारी गावातील भाजप कार्यकर्त्याच्या पुतण्यासह दोघांना मुसक्या आवळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तेजस राजेश म्हात्रे (25, करळ) आणि सत्यम महेश तांडेल (सोनारी) या दोघांना अटक करण्यात आली असून, यापैकी एक आरोपी थेट भाजपाच्या स्थानिक नेत्याच्या घरातला आहे. तेल चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यात राजकीय पार्श्वभूमी असल्याची चर्चा सध्या उरणच्या गल्लीबोळात सुरू आहे.
नवी मुंबई क्राईम ब्रँचने या दोघांना झडप घालताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. क्राईम ब्रँचचे अधिकारी संजय रेड्डी अधिक तपास करत असून, त्यांनी मात्र संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, न्हावा शेवा पोलिसांना या प्रकरणाची कानोकान खबर नव्हती. हाकेच्या अंतरावर सुरु असलेला तेल तस्करीचा हा गोरखधंदा पोलिसांच्या नजरेआड कसा राहिला? हे खरेच अनाकलनीय आहे.
काहींनी थेट सवाल उभा केला आहे. या गुन्हेगारांना पोलीस आणि राजकीय वरदहस्त नव्हता ना? अशी चर्चा सुरू आहे. सदर प्रकरण केवळ चोरीपुरतं मर्यादित नसून, या टोळीने तेलवाहिन्यांना छिद्र पाडून सरळ झुडपांतून पाईप जोडून टँकरमध्ये भरून डिझेल लंपास केल्याचं उघड झालं आहे. काही वर्षांपूर्वी करळ पुलाच्या बाजूने अशाच प्रकारचं प्रकरण उघड झालं होतं. पण, त्यात आरोपीला अटक करण्यात यश आले नव्हते. आता पुन्हा तोच जुना धंदा नव्या पद्धतीने सुरू झाल्याचं स्पष्ट होत आहे. धुतम परिसरात ही अशा प्रकारे टॅप लावून तेलाची चोरी होत असल्याचे समजते.
उरण परिसरात सध्या फक्त डिझेल नव्हे, तर कंटेनर फोडी, चरस, गांजा, देशी दारू अशा अवैध धंद्यांची रेलचेल असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे. सोनारी, धुतुम, द्रोणागिरी नोड हे नव्या गुन्हेगारी जाळ्याची केंद्रं बनत चालली आहेत. यामुळे या टोळीने किती काळ हा धंदा केला?, चोरीचं इंधन कुठं विकलं गेलं?, यामागे मोठं नेटवर्क आहे का?, पोलिसांची भूमिका संशयास्पद का वाटते? हे सारे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. तपास अधिकारी संजय रेड्डी हेही सध्या गुप्त मूडमध्ये असल्याने अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण एवढं मात्र नक्की न्हावा शेवा बंदराच्या पायथ्याशी ‘तेलतस्करांची सत्ता’ काहींना माहीत असूनही लोकांना अंधारात ठेवलं जातंय, अशी चर्चा सुरू आहे.